सरकारी दाखला पाहिजे असेल तर आधी एक झाड लावा; सावंतवाडीतील ग्रामपंचायतीचा ‘सही’ निर्णय

   Follow us on        

सावंतवाडी: पर्यावरण रक्षणासाठी केवळ भाषणे न देता प्रत्यक्षात कृती कशी करावी, याचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ​मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. गावात विवाह नोंदणी असो किंवा मृत्यूचा दाखला, यांसारखी महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी आता एक वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

​काय आहे हा उपक्रम?
गावचे सरपंच श्रीमती मिलन पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नावीन्यपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ​ या निर्णयानुसार, गावातील नवीन विवाहित जोडप्याला आपला विवाह नोंदणीचा दाखला हवा असल्यास, त्यांना एक फळझाड किंवा सावली देणारे झाड लावावे लागेल. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वारसांना एक झाड लावावे लागेल, तरच मृत्यूचा दाखला दिला जाईल.

हे दाखले मिळविण्यासाठी झाड लावल्यानंतर त्याचा फोटो ग्रामपंचायतीत जमा करावा लागणार आहे. या उपक्रमामुळे गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा वाढण्यास मदत होणार आहे.

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे अशी ​या निर्णयामागची भूमिका आहे तसेच येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आणि हिरवेगार गाव मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

​मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. प्रशासकीय कामाची सांगड पर्यावरणाशी घालणारा हा राज्यातील पहिलाच किंवा अत्यंत दुर्मिळ असा प्रयोग मानला जात आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी “इतर ग्रामपंचायतींनीही या मॉडेलचा स्वीकार करावा,” अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search