मुंबई: देशभरात भासणाऱ्या एलपीजी (LPG) सिलिंडरच्या तुटवड्यामुळे आता भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या (IRCTC) कार्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. या संकटामुळे रेल्वे गाड्यांमधील शिजवलेल्या जेवणाची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा आणि ज्या प्रवाशांनी तिकिटासोबत जेवण आरक्षित केले आहे, त्यांना त्यांचे पैसे परत करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टंचाईचा सर्वाधिक फटका आयआरसीटीसीच्या ‘बेस किचन’ला बसत आहे, जिथे जेवण तयार करून ते पँट्री कारमध्ये चढवले जाते. पँट्री कारमध्ये सिलिंडर नेले जात नसल्याने तिथे फक्त जेवण गरम करणे आणि वितरणाचे काम चालते, मात्र मुख्य स्वयंपाकघरांनाच गॅसचा पुरवठा कमी पडत असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या जेवण पुरवठ्यावर गदा आली आहे.
देशभरात आयआरसीटीसी दररोज सुमारे १७ लाख जेवणांचे वाटप करते, ज्यापैकी २०% वाटा एकट्या पश्चिम विभागात आहे. त्यामुळे हा तुटवडा कायम राहिल्यास या विभागाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती गंभीर असून आगामी काळात ती अधिक बिकट होऊ शकते. एलपीजीचा पुरवठा सुरळीत न झाल्यास गाड्यांमधील खाद्यसेवा विस्कळीत होणे अटळ आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाला अवगत करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ सेवा बंद ठेवण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असले, तरी सध्याची परिस्थिती पाहता प्रवाशांना मिळणाऱ्या शिजवलेल्या जेवणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


