मंगळुरू: कोस्टल कर्नाटक विभागाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना तेथील स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, रेल्वे प्रशासनाकडे ‘मंगळुरू-भावनगर एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण रेल्वे सध्या मंगळुरू सेंट्रल आणि चर्लापल्ली (हैदराबाद जवळ) दरम्यान एक नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही रेल्वे मंगळुरू-रामेश्वरम एक्सप्रेसच्या उपलब्ध डब्यांचा (Rake) वापर करून चालवली जाणार आहे. मात्र, या रेल्वेचा नियोजित मार्ग केरळ आणि तामिळनाडू मार्गे जात असल्याने तटीय कर्नाटकातील प्रवाशांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हा मार्ग स्थानिक प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरा असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर विनाकारण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वास्तविक, आयआरटीटीसी (IRTTC) च्या बैठकीत मंगळुरू ते भावनगर दरम्यान कोकण रेल्वे मार्गे थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. तटीय कर्नाटकातील हजारो लोक व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात स्थायिक आहेत. मात्र, मंगळुरूहून गुजरातसाठी अद्याप एकही समर्पित आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, मंजूर झालेला भावनगरचा प्रस्ताव बाजूला सारून पुन्हा केरळ-तामिळनाडू मार्गे जाणारी रेल्वे लादली जात असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंगळुरू रेल्वे स्थानक हे केवळ शेजारील राज्यांच्या रेल्वे गाड्यांसाठीचे ‘टर्मिनल’ बनत चालले असून, कर्नाटकच्या स्वतःच्या कनेक्टिव्हिटी गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ‘दक्षिण कन्नड रेल्वे यात्री संघ’ आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या संदर्भात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना समाजमाध्यमांद्वारे साकडे घालण्यात आले आहे. प्रवाशांच्या मते, जर प्रस्तावित रेल्वे हसन किंवा मडगाव-हुबळी कॉरिडॉरऐवजी कोकण रेल्वे मार्गे चालवली, तर त्याचा फायदा पश्चिम भारताला जोडण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल. दक्षिण रेल्वेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि तटीय कर्नाटकच्या दीर्घकालीन मागणीचा मान राखून तात्काळ मंगळुरू सेंट्रल – भावनगर टर्मिनस एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आता केली जात आहे. यामुळे केवळ प्रवाशांची सोयच होणार नाही, तर या भागातील औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे असा विश्वास दक्षिण कन्नड रेल्वे यात्री संघाने व्यक्त केला आहे.
🚆 Coastal Karnataka Deserves Fair Railway Connectivity
It has come to our notice that Southern Railway is reportedly planning to introduce a new train service between Mangaluru Central railway station and Charlapalli railway station (near Secunderabad) using the rake of Train… pic.twitter.com/APIMQty93o
— Dakshina Kannada District Railway Users (@dkdistrictrail) March 12, 2026


