Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडीच्या ४ फेऱ्या; परतीच्या प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी संख्या ०११०६/०११०५ मडगाव-पनवेल-मडगाव साप्ताहिक विशेष (TOD) या गाडीच्या दोन्ही दिशांनी मिळून एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

​या वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०११०६ मडगाव-पनवेल विशेष ट्रेन मडगाव येथून रविवार, दिनांक २४ मे २०२६ आणि ३१ मे २०२६ रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०४:०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी संख्या ०११०५ पनवेल-मडगाव विशेष ट्रेन सोमवार, दिनांक २५ मे २०२६ आणि ०१ जून २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​ही ट्रेन २३ आयसीएफ (ICF) कोचच्या संरचनेसह धावणार असून, यामध्ये ११ स्लीपर क्लास, ३ थर्ड एसी (3A), ७ जनरल आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. मध्य रेल्वे (CR) क्षेत्रात या गाडीला रोहा, पेण आणि पनवेल या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि माणगाव या स्थानकांवरही ही ट्रेन थांबणार आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

 

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: “अपूर्ण रस्त्यावर पूर्ण टोल वसुली”

   Follow us on        

रायगड, २१ मे २०२६: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम १७-१८ वर्षांपासून रखडले असताना आणि अनेक भाग अजूनही अपूर्ण असताना खारपाडा टोल प्लाझावर टोल वसुली सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ते, खड्डे आणि खराब गुणवत्तेमुळे होणारे अपघात या पार्श्वभूमीवर ही टोल वसुली अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोल प्लाझावर १७ मे २०२६ पासून टोल वसुली सुरू झाली. फास्टॅगद्वारे वाहनांमधून पैसे कापले जाऊ लागले आहेत. मात्र, पेन ते माणगाव, इंदापूर बायपास, उड्डाणपुल, सर्व्हिस रोड्स आणि इतर अनेक महत्त्वाचे भाग अजूनही अपूर्ण आहेत. प्रवाशांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून, डाव्हर्सनमधून आणि अपूर्ण बायपासवरून प्रवास करावा लागत आहे.

अपघातांची मालिकारायगड विभागातील NH-66 वर २०२२ ते २०२४ दरम्यान झालेल्या अपघातांच्या आकडेवारीनुसार अनेक जीव गमावले गेले आहेत. अपूर्ण रस्ते, अचानक डाव्हर्सन, खराब पृष्ठभाग आणि रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे अपघात वाढले आहेत. कोकणातील अनेक कुटुंबे या महामार्गामुळे वेदनेत आहेत. गेल्या काही वर्षांत २४०० हून अधिक लोकांचा या महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्याचे आकडे उपलब्ध आहेत.

रायगड प्रेस क्लबने या टोल वसुलीला “अन्यायकारक” ठरवत त्वरित स्थगित करण्याची मागणी केली आहे. उद्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. स्थानिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी कवींना आवाहन करत कवितेद्वारे या मुद्द्यावर विरोध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. “रस्ता अपूर्ण, तरी टोल पूर्ण?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सरकारचे आश्वासन आणि वास्तवकेंद्र आणि राज्य सरकारने महामार्गाचे पूर्ण काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काम ९३% पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी रायगड आणि रत्नागिरीतील अनेक गंभीर भाग अजूनही बाकी आहेत. आता पूर्णत्व २०२७ पर्यंत ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवासी आणि स्थानिक व्यापारी म्हणतात, “प्रथम पूर्ण रस्ता द्या, मग टोल घ्या.” अपूर्ण महामार्गावर पूर्ण टोल आकारणी ही प्रवाशांची लूट असल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरणार आहे.

कोकणवासीयांकडून आंदोलन, सोशल मीडियावर तीव्र विरोध आणि कविता-प्रतिबंध यांचा मेळ घालून हा मुद्दा अधिक तीव्र होत चालला आहे. NHAI आणि संबंधित विभागाकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण आणि अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.


 

 

 

 

 

 

Facebook Comments Box

‘आयएनएस गुलदार’ अरबी समुद्रात विसावली; सिंधुदुर्गात साकारणार देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि पर्यटन केंद्र

   Follow us on        

सिंधुदुर्ग:भारतीय नौदला सेवेतून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ (INS Guldar) ही युद्धनौका महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती रॉक जवळ यशस्वीरित्या समुद्रात बुडवली आहे. सुमारे २० ते २२ मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही नौका आता विसावली असून, याद्वारे भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ (Artificial Coral Reef) आणि पाणबुडी (Submarine) पर्यटनाचा अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. १९ मे रोजी विजयदुर्गजवळ अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल वारशाचे जतन करत सागरी पर्यटनाला चालना देणारा हा केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.

​जवळपास चार दशके भारतीय नौदलात शौर्य गाजवणारी कुंभीर-श्रेणीतील ही लँडिंग शिप १२ जानेवारी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विनामूल्य सुपूर्द केली. नौका समुद्रात विलीन करण्यापूर्वी तिची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि सागरी पर्यावरणाला तसेच जलचरांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यातील सर्व घातक व रासायनिक पदार्थ काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गथाणे आणि त्यांची टीम या प्रकल्पावर काम करत आहे.

​हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, पर्यटकांना ‘पॅडी’ (PADI) प्रमाणित डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून या खऱ्याखुऱ्या युद्धनौकेचा थरार जवळून अनुभवता येईल. तसेच ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सोय केली जाणार आहे, जेणेकरून सुरक्षितपणे या ऐतिहासिक नौकेचे दर्शन घेता येईल. या जहाजाच्या अवशेषांवर हळूहळू वनस्पती, मासे आणि प्रवाळांची वाढ होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या कृत्रिम बेटासारख्या परिसंस्थेत होईल, ज्यामुळे सागरी जीवनाला मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक आणि साहसी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक कोळी बांधव आणि तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

Facebook Comments Box

​कोकण रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; गाड्यांच्या वक्तशीरपणावर परिणाम होण्याची शक्यता

   Follow us on        

मंगळूर:कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मान्सूनपूर्व ट्रॅक तपासणी तसेच प्रतिबंधात्मक कामांना सुरुवात केली आहे. कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी (सिंगल-लाईन) असून या मार्गावर गाड्यांची वर्दळ खूप जास्त असते, त्यामुळे याचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करावे लागते. हा रेल्वे मार्ग अत्यंत खडतर भूप्रदेश आणि मुसळधार पावसाच्या क्षेत्रातून जात असल्याने, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सध्या विविध तांत्रिक व अभियांत्रिकी कामे वेगाने केली जात आहेत.

​या मान्सूनपूर्व कामांमध्ये कटिंग लोअरिंग (डोंगराचे कडे कमी करणे), बीएलटी (BLT) दुरुस्ती, ट्रॅक लिफ्टिंग, डीप स्क्रीनिंग, थ्रू-ट्रॅक नूतनीकरण आणि पीक्यूआरएस (PQRS) देखभालीचा समावेश आहे. ट्रॅकची क्षमता आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही कामे केली जात आहेत. या दुरुस्तीच्या कामांमुळे मार्गावर तात्पुरते गती निर्बंध (स्पीड रिस्ट्रिक्शन्स) आणि ब्लॉक घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे गाड्यांना काही प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण केली जातील, त्यानंतर गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल. प्रवाशांनी वेळापत्रकातील बदलांची माहिती मिळवण्यासाठी स्टेशनवरील घोषणा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप्सचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Facebook Comments Box

“जीव गेला तरी जमीन विकणार नाही” शिरशिंगेवासीयांनी जमीन मोजणी हाणून पाडली

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील, कोकणाचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावात सामूहिक जमिनी हडप करण्याचा बाहेरच्या धनदांडग्यांचा कुटील डाव ग्रामस्थांनी एकजुटीने हाणून पाडला आहे. गावातील श्रीदेवी पाहुणाई रवळनाथ मंदिरामध्ये गावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि सरपंच एकत्र आले होते. या ठिकाणी महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने मंगेश तारकर आरोसकर यांच्या जागेसंदर्भात लावण्यात आलेली जमिनीची मोजणी सर्व गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत आणि प्रशासनाला जाब विचारत पूर्णपणे उधळून लावली. ‘जीव गेला तरी चालेल, पण आपली वडिलोपार्जित जमीन कोणत्याही परप्रांतीय किंवा बाहेरच्या व्यक्तीला कवडीमोल भावाने विकणार नाही’, असा पक्का निर्धार या सभेमध्ये सर्व शिरशिंगेवासीयांनी एकमुखाने केला.

​गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरशिंगे गावातील ३२ एकर हे सामायिक (सामूहिक) क्षेत्र असून त्यावर संपूर्ण गावाचा समहक्क आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला संमतीशिवाय किंवा धडेवाटप न करता जमिनीचा तुकडा देता येणार नाही. गावातील काही एजंट आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या जमिनी काही हजारांत बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात एकीचा नवा इतिहास रचत भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना जागेवरच मोजणी स्थगितीचा पंचनामा करण्यास भाग पाडण्यात आले.

​याप्रसंगी शिरशिंगे गावाचे सरपंच दीपक शांताराम राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पूर्वजांनी जशी सामायिक जमीन एकत्र ठेवली, तशीच ती पुढेही कायम राखण्यासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन या मोजणीला आणि जमीन विक्रीला पूर्ण विरोध केला आहे. जमीन राहिली तरच गाव आणि गावाचे अस्तित्व टिकून राहील, त्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच चुकीच्या पद्धतीने मोजणीचे घाट घालू नका, असा इशारा त्यांनी प्रशासनालाही दिला आहे. गावाच्या या एकजुटीमुळे धनदांडग्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असून हा शिरशिंगेवासीयांच्या एकीचा मोठा विजय मानला जात आहे.

Facebook Comments Box

खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना मुंबईत ‘नो एंट्री’! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुंबई शहरात दररोज राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आणि देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स व पॅसेंजर गाड्या येत असतात. या वाहनांमुळे शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता देशभरातून येणाऱ्या या खाजगी प्रवासी गाड्यांना मुंबईच्या वेशीवर म्हणजेच दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांवरच थांबवले (रेड सिग्नल दिला) जाईल. या गाड्या या ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडतील आणि तिथूनच पुन्हा माघारी परततील. यामुळे मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवरील अंतर्गत वाहतूककोंडी आणि खाजगी बसच्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

​या नवीन व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी जकात नाक्यांवरूनच मेट्रो, बेस्ट (BEST) बसेस आणि टॅक्सी/कॅबची उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर आणि मानखुर्द या दोन्ही ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे मल्टिप्लेक्स, थ्री-स्टार व फाईव्ह-स्टार हॉटेल्स, भव्य शॉपिंग सेंटर्स, पार्किंग हब आणि फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, वाहनांसाठी सीएनजी, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स यांसारख्या आवश्यक इंधनाच्या सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असतील.

​सन २०१७ मध्ये जकात (Octroi) बंद झाल्यापासून दहिसर आणि मानखुर्द येथील हे जकात नाके ओस पडले होते. सध्या दहिसर येथे १८,८६९ चौरस मीटर आणि मानखुर्द येथे २९,७७४ चौरस मीटर अशी मोक्याची जागा उपलब्ध असून पालिकेला त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. या जागेचा पुनर्विकास करण्यासाठी पालिका एकूण १२३२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे; ज्यामध्ये दहिसर जकात नाक्यासाठी ९९२ कोटी रुपये आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या भव्य प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी तर फुटणार आहेच, शिवाय या सुविधांमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

Facebook Comments Box

Video: आता तर कहरच झाला! मुंबईमध्ये नालेसफाई करताना पूर्ण रिक्षाच सापडली

   Follow us on        

मुंबई: मानसूनपूर्व नाला सफाई अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कामगारांना साकी नाका परिसरातील मुख्य नाल्यातून पूर्ण ऑटो रिक्षाचा सांगाडा बाहेर काढावा लागला. १८ मे रोजी साकी नाक्यातील सांगाडा लोखंडी कचरापेटी परिसरात क्रेन आणि यंत्रांच्या सहाय्याने हा प्रचंड अवजड कचरा बाहेर काढण्यात आला.नाल्याच्या आत पूर्णपणे बुडालेला आणि चिखल, प्लास्टिक व इतर कचऱ्याने झाकलेला हा ऑटो रिक्षा बाहेर काढताना बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागली.

व्हिडिओत स्पष्ट दिसते की, रिक्षाचा संपूर्ण फ्रेम, चाके आणि इतर भाग एकत्रितपणे नाल्यात अडकले होते. यासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर घनकचराही काढण्यात आला.बीएमसीने यानिमित्त मुंबईकर नागरिकांना नद्या, नाले आणि जलप्रवाहात घनकचरा, तरंगता कचरा किंवा अवजड साहित्य टाकू नये, असे नम्र आवाहन केले आहे.

मात्र, नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये अनेकजण म्हणत आहेत की, “केवळ आवाहन पुरेसे नाही, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी.”या प्रकारच्या घटनांमुळे मुंबईतील नाल्यांच्या सफाईचा खर्च आणि मेहनत वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

 

Facebook Comments Box

कोल्हापूर-आंबोली राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना टोल माफी

   Follow us on        

आजरा: कोल्हापूर-आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीच्या वादावर अखेर तोडगा निघाला असून आजरा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ‘टोलमुक्ती संघर्ष समिती’च्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आजरा तालुक्यातील घरगुती वापराच्या (प्रायव्हेट) चारचाकी गाड्यांना टोल पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या टोल वसुलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

​टोल माफीचा लाभ घेण्यासाठी आजरा तालुक्यातील ज्या खाजगी चारचाकी वाहनांना ‘MH 09’ पासिंग आहे, किंवा ज्यांच्याकडे गावातील गाडी असल्याचा सरपंच दाखला आहे, अशा वाहनधारकांना आधारकार्ड, फास्ट टॅग (FASTag) आणि आरसी बुकची (RC Book) झेरॉक्स प्रत जमा करावी लागणार आहे. याशिवाय, ऊस हंगामाच्या कालावधीत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही टोलमधून पूर्णपणे मुक्त करण्यात आले असून, संबंधित वाहनांची यादी साखर कारखाना प्रशासनाने देणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, पिवळी नंबर प्लेट असणाऱ्या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलतीचा मासिक अथवा वार्षिक पास देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

​या बैठकीदरम्यान टोल नाक्यावरील अंतर्गत कामे करण्याची मुभा प्रशासनाला देण्यात आली असून, पंचायत समितीपासून पाणी गटारात न जाता रस्त्यावरून वाहणे, पथदिवे दुरुस्ती आणि पश्चिम भागातील प्रलंबित कामे येत्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सर्व कामांच्या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ दिवसांत पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत झालेल्या कामांची पाहणी करूनच टोल प्रत्यक्ष सुरू करायचा की नाही, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि टोलमुक्ती संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box

​कोरोना काळात रद्द केलेले गाड्यांचे थांबे पूर्ववत होण्याच्या शक्यता वाढल्या

   Follow us on        

सावंतवाडी:कोरोना महामारीच्या काळात सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून बंद करण्यात आलेले प्रमुख एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सावंतवाडीकर रेल्वे प्रवाशांना लवकरच या संदर्भात आनंदाची बातमी मिळेल, असे आश्वासन देत त्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

​कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) आणि माहिती अधिकार महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने अध्यक्ष विनोद नाईक यांनी मंगळवारी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सावंतवाडीकरांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केले. या बैठकीत प्रामुख्याने गरीब रथ एक्सप्रेस (१२२०२), राजधानी एक्सप्रेस आणि मंगळूरू एक्सप्रेस (१२४३४) या गाड्यांना सावंतवाडी येथे पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

​यापूर्वी २६ जानेवारी २०२५ रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश येडगे यांनी मुंबई येथे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले होते. आजच्या बैठकीत त्या जुन्या निवेदनाची आठवण करून देत, हे थांबे सावंतवाडीकरांसाठी किती गरजेचे आहेत हे पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

​कोरोना काळात बंद झालेल्या थांब्यांमुळे सावंतवाडी परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सध्या मुंबई किंवा इतर राज्यांत प्रवास करताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे हक्काचे थांबे पुन्हा सुरू व्हावेत, अशी जनतेची मागणी आहे. पालकमंत्र्यांनी यावर तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासित केले आहे. या गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू झाल्यास चाकरमान्यांसह सर्वांनाच खूप मोठा दिलासा मिळणार असून, पालकमंत्र्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे आता सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Facebook Comments Box

कोकणातील पारंपरिक आणि नैसर्गिक सजावटीला सोशल मीडियावर पसंती

   Follow us on        

सावंतवाडी: आजकालच्या आधुनिक आणि भपकेबाज सजावटीच्या काळात कोकणातील एका पारंपरिक, नैसर्गिक सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘कोकणचा भटक्या’ (kokancha_bhatkya) या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले असून, त्याला तब्बल ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर आता हा आकडा १ मिलियनच्या पार जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

​या व्हिडिओमध्ये बांबू आणि विणलेल्या माडाच्या झावळ्यांचा वापर करून अत्यंत देखणी अशी नैसर्गिक सजावट केल्याचे दिसून येत आहे. या सजावटीमध्ये कोकणी संस्कृतीचे प्रतीक फणस देखील लटकवलेले पाहायला मिळत आहे. ही सुंदर  कलाकृती ‘कारीवडे भैरववाडी’ (Kariwade, Bhairavwadi) तील ग्रामस्थांच्या सहकार्यातून दिनांक १४ मे रोजी वाडीतील सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने ही सजावट साकारण्यात आली आहे. तुषार साईल, रोहन साईल आणि दीपक साईल यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी मिळून ही आकर्षक सजावट केली आहे. “आजकालच्या मॉडर्न डेकोरेशनपेक्षा अशी नैसर्गिक सजावट कशी वाटते?” असा प्रश्न विचारत निसर्गरम्य कोकणची ही कलात्मक बाजू सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search