Category Archives: मुंबई

Mumbai Local | मध्य उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकात ऑगस्टपासून बदल

   Follow us on        
मुंबई: मध्य उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय लोकलच्या नव्या वेळापत्रकाची आखणी केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या १० लोकल दादर स्थानकातून सुटणार असून परळ स्थानकातून अतिरिक्त २४ लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
दादर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महिन्यांपूर्वीच प्लॅटफॉर्म क्रमांक आठ रुंद करण्यात आला. फलाट क्रमांक दहाचे दुतर्फीकरण झाल्याने जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने चढ-उतार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला, तसेच फलाट क्रमांक नऊ आणि दहादरम्यान असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले; मात्र तरीही दादर स्थानकांतून लोकल पकडताना प्रवाशांची गैरसोय होत होती. त्याबाबत अनेक तक्रारी मध्य रेल्वेकडे केल्या होत्या. याची दाखल घेऊन मध्य रेल्वेने दादर आणि परळ स्थानकातून आणखी लोकल सोडण्याचे नियोजन केले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मध्य रेल्वेला सध्या नव्याने लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकलचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या अप आणि डाऊनच्या प्रत्येकी पाच अशा एकूण १० फेऱ्या दादर स्थानकातून, तर २४ धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. सध्या परळ स्थानकातून २२ फेऱ्या सूटत असल्याने परळहून सुटणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या ४६ पर्यंत पोहोचणार आहे.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची उद्या परळ येथे एल्गार सभा

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा : श्री.यशवंत जडयार*

   Follow us on        

मुंबई दि. २० जुलै:अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची एल्गार सभा रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा. सोशल सरव्हिसलिग हायस्कूल दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष श्री.शेखर बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

समितीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे व त्याला प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देणे,नियोजित वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस व दिवा चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्या मिळत नसल्याने यापुर्वीही परळ येथील प्रा.मधू दंडवते जन्मशताब्दी उत्सव व सावंतवाडी रोड स्टेशन येथील टर्मिनससाठी केलेले उपोषणातून समितीने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे,यासाठी ही एल्गार सभा खूप महत्वाची आहे.

गणेशउत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण,याला मुंबईतून लाखो चाकरमनी कोकणातील आपल्या गावी जातात, त्यासाठी त्यांना पुरेशा कोकण रेल्वेच्या रेल्वे मिळवून देण्यासाठी ही सभा समस्त कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.

कित्येकदा कोकण रेल्वेमार्गावरून गणेशउत्सवासाठी सोडलेल्या जादा गणपती स्पेशल एक्सप्रेसचे तिकीट बुकींग पहिल्या तीन मिनीटामध्येच फुल होते,याच्याने खरा लाभार्थी असलेला कोकणी माणूस तिकीटापासून वंचितच राहतो,चाकरमन्यांचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे की,रेल्वेच्या दलालांचे बुकींग कसे होते?मग सर्वसामान्य कोकणी माणसाला गणपतीचे तिकीट का मिळत नाही?

लोकसभेची निवडणूक समोर ठेवून कोकणातील अनेक नेत्यांनी समितीला आश्वासने दिली होती त्याचे पुढे काय झाले? यासाठी ही एल्गार सभा निर्णायक ठरणार आहे,अन्यथा विधानसभेची निवडणूक फक्त पुढील तीनच महिन्यांवर आलेली आहे.

समितीच्या ह्या एल्गार सभेला मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,मिरा भाईदर,वसई विरार,बोईसर पालघर,भांडूप,ठाणे दिवा,कल्याण डोंबीवली,बदलापूर परिसरातील कोकण वासियांनी मोठया संस्थेने सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले आहे.

धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.

 

Mumbai Metro | मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलै पासून सुरू होणार

   Follow us on        

मुंबई, दि. १७ जुलै: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. २४ जुलै रोजी या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

Block "ganesh-makar-1" not found

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन अर्थात अक्वा लाईन जी कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी धावणार आहे. येत्या २४ जुलैपासून या मेट्रोला सुरुवात होत आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या ३३.५ किमी अंतरावर ही मेट्रो धावणार आहे. यामध्ये एकूण २७ थांबे असणार आहेत. या मेट्रोमुळं उपनगरीय प्रवास तसंच प्रत्यक्ष रस्त्यावरुन धावण्याऐवजी भूमिगत धावणार असल्यानं रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुकर बनवण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाईन) २४ जुलैपासून सुरु होत आहे. ही मेट्रो मुंबई शहराच्या वेगाला नवा वेग देईल.

प्रभादेवी-दादर दरम्यान झाड पडल्याने पाश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत

मुंबई, दि. १४ जुलै: पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास झाड पडल्याने धिम्या मार्गावरील लोकल जवळपास तासभर खोळंबली होती. रविवारी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी-दादर दरम्यान डाऊन दिशेकडील धीम्या मार्गावर झाड पडले.

रेल्वे रुळांवर झाड पडल्याने, बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी दाखल होऊन झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. जवळपास तासाभराच्या रखडपट्टी सकाळी ८.२० वाजता झाड बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर बोरिवलीच्या दिशेने धीम्या मार्गावरील लोकल सुरू झाल्या.

तर, सकाळच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दुरुस्तीची कामे करून सकाळी ९.०५ वाजता बिघाड दूर करून बोरिवली येथील ठप्प झालेल्या तीन मार्गिका सुरू केल्या. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरास विधानसभेत अखेर मंजूरी; अशी असतील नवीन नावे.

   Follow us on        

मुंबई : ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नावे मुंबई उपनगरातील अनेक स्थानकांना मिळाली होती. इतकी वर्षे ही नावे या रेल्वे स्थानकांची ओळख बनली होती. आता या स्थानकांच्या नावांना स्थानिक परिसरातील ओळखीनूसार नावे देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावा राज्य विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात अखेर मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. आता यापुढे इंग्रजी नावे जाऊन नवीन मराठी नावे स्थानकांना मिळणार आहेत. त्यामुळे आता मरीन लाईन्स मुंबादेवी असे त्या परिसराला साजेसे असे नाव मिळणार आहे. तर करीरोडला काय नाव मिळणार आहे. ? ते पाहूयात….

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव आज विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर रितसर नावं बदलण्यात येणार आहेत. आता करी रोड – लालबाग रेल्वे स्थानक म्हटले जाणार आहे. तर पुढील बदल अनुक्रमे सँडहर्स्ट रोड – डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स – मुंबादेवी, चर्नी रोड – गिरगाव, कॉटन ग्रीन – काळाचौकी, डॉकयार्ड रोड – माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक अशी नावे देण्यात आली आहेत.

मुंबई सेंट्रस स्थानकाला मुंबईचे शिल्पकार समाजसेवक नाना शंकर शेठ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नामदार जगन्नाथ ( शंकर ) शेठ प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे करीत आहे. परंतू या स्थानकाचे नाव बदलण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाना शंकर शेठ यांना आशियातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. या जीआपीआर रेल्वे कंपनीचे कार्यालयच नाना शंकर शेठ यांच्या घरात उघडण्यात आले होते. व्हीक्टोरीया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्याची मागणी 90 च्या दशकात कॉंग्रेसने केली होती.

Heavy rain in Mumbai: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकणरेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.

… तर येत्या विधानसभा निवडणुकीत NOTA पर्याय वापरू- जनआक्रोश समिती सभेत कोकणकरांचा ईशारा

   Follow us on        

मुंबई :मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या न पाळलेल्या तारखा, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी पोकळ आश्वासने आणि नेहमीप्रमाणे पाहिल्याच पावसात महामार्गाची होणारी दयनीय अवस्था यामुळे वैतागलेला कोकणकर जनआक्रोश समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

रखडलेला महामार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. कोकणातील बहुतेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षात असूनही ही अवस्था आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री महाराष्ट्रातील असूनही ही परिस्थिती आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेले महामार्ग बनवण्याच्या अट्टहास धरला आहे. त्यांना मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीबद्दल देणे घेणे नाही. या सर्वांना वैतागून पुन्हा एकदा जनआक्रोश समिती आक्रमक झाली आहे. शनिवार दिनांक २९ जून रोजी समितीची निर्धार सभा मुंबई येथे पार पडली. या सभेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले.

प्रशासनाला जागे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे २८ जुलै २०२४ रोजी जनआक्रोश समितीतर्फे होमहवन घालण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. कोकणातील लोकप्रतिनिधी महामार्ग संदर्भात आवाज उठवीत नसल्याने त्यांच्या घरासमोर निदर्शन करून त्यांना जागे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

निवडणुकीवर बहिष्कार टाकणे

लोकसभेला ३७००० कोकणकरांनी नोटाला मतदान केले. विधानसभेला देखील कोकणातील उमेदवार यांच्या विरोधात NOTA मतदान करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला.

 

 

अटल सेतूवर पडल्या भल्या मोठ्या भेगा; भ्रष्टाचार झाल्याचा नाना पाटोले यांचा आरोप

   Follow us on        

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

भाजपाचे म्हणणे काय?

नाना पटोले यांच्या आरोपांना भाजपच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून हा रस्ता अटल सेतू नसून त्याला जोडणारा मार्ग असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच पडलेल्या भेगा या तांत्रिक त्रूटीमुळे पडलेल्या नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.

 

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक रविवारी मुंबईमध्ये संपन्न

बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका

   Follow us on        

मुंबई :काल रविवार दिनांक १६ जून रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक श्री. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली. या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका करण्यात आल्या. त्याचप्रमाणे समितीच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत चर्चाही यावेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

१. श्री. यशवंत जड्यार यांच्याऐवजी श्री. अक्षय महापदी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.

२. ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

३. श्री. अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.

४. नवनियुक्त सचिव अक्षय महापदी यांना संघटनेचा पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.

५. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.

६. श्री. प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

७. तसेच खजिनदार कु. मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.

८. १४ जानेवारी, २०२४ जन्मशताब्दी कार्यक्रमाचा जमाखर्च ताळेबंद मंजूर करण्यात आले व उर्वरित रक्कम श्री. राजाराम कुंडेकर यांच्याकडे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

९. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा.

१०. तसेच परब मराठा समाज यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत ही सभा संपन्न झाली.

या सभेला ॲड. योगिता सावंत, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. शांताराम शंकर नाईक, श्री.सुनिल सीताराम उतेकर, श्री. दीपक चव्हाण,श्री. विशाल तळावडेकर, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री. राजू सुदाम कांबळे, श्री. तानाजी बा. परब, श्री. रमेश सावंत, श्री. राजाराम बा. कुंडेकर, श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, श्री. अभिषेक अनंत शिंदे, श्री. प्रमोद वासुदेव सावंत, श्री. आशिष अशोक सावंत, श्री. मनोज परशुराम सावंत, श्री. सुधीर लवू वेंगुर्लेकर, श्री. सागर कृष्णा तळवडेकर, श्री. संजय धर्माजी सावंत, श्री. अभिजित धुरत हे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search