Category Archives: रत्नागिरी

Mumbai Goa Highway: महामार्गावरील प्रवास महागणार!

   Follow us on        

रायगड: गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. असे असतानाच या महामार्गावर टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जून महिन्यापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात नागोठाणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेली घाट, माणगाव आणि इंदापूर जवळील रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दररोज भीषण वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये आधीच तीव्र असंतोष आहे.

​तीन ठिकाणी टोलनाक्यांचे नियोजन आणि स्थानिक विरोध

​अपूर्ण कामांच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यात खारपाडा, खांब आणि पोलादपूरजवळील लोहारे अशा तीन ठिकाणी टोलवसुली करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यापैकी खारपाडा येथे प्रत्यक्ष टोलवसुली सुरू झाली असून, या टोलनाक्याचे कंत्राट तीन महिन्यांचे आहे. नागरिकांकडून याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच, खांब येथेही टोलनाका उभारण्यात आला आहे. खारपाडा येथील टोलनाक्यावरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन खांब येथे टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर लोहारे येथेही टोलनाका सुरू केला जाईल. या लागोपाठच्या टोलनाक्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य कोकणवासीयांसह वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबरच बाजारपेठेतील इतर वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​लोकप्रतिनिधींचे मौन ​आंदोलनाचा इशारा

​खारपाडा टोल सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना यातून वगळण्यात येईल, असे तोंडी सांगण्यात आले असले तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर पूर्णपणे मौन बाळगल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पूर्वी खारघर टोलनाक्याविरुद्ध जशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली होती, तशी भूमिका या टोलबाबत घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन त्याचे अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. तसेच, या अन्यायाविरोधात २१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशाराही रायगड प्रेस क्लबने प्रशासनाला दिला आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात; रिक्षाचालकांचा दुर्दैवी मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

   Follow us on        

संगमेश्वर: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी सायंकाळी नाणीज येथील जुन्या मठाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास दाभोळे परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने रिक्ष (एमएच-०८ एक्यू ८८६६) जात होती. याच वेळी समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाने अचानक ब्रेक लावले. मागून भरधाव वेगाने येणारी रिक्षा या ट्रॅक्टरवर थेट जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षेचा चक्काचूर झाला आणि चालक प्रकाश कांबळे यांचा जागीच प्राण गेला.

​या भीषण अपघातात रिक्षेतील दोन महिला प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्गाच्या कामामुळे आणि वाहनांच्या वेगामुळे झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तिरुवनंतपुरम – मदार जंक्शन विशेष एक्सप्रेस शनिवारपासून संगमेश्वर स्थानकावर थांबणार

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने संगमेश्वर रोड स्थानकावर तिरुवनंतपुरम मदार विशेष जादा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २ मे २०२६ पासून ६ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

​गाडी क्र. ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर बुधवारी तिरुवनंतपुरमवरून सुटते) दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर पोहोचेल आणि ०८:१८ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला ६ मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा थांबा मिळेल.

​तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर शनिवारी मदार जंक्शनवरून सुटते) दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर येईल आणि २३:१२ वाजता मार्गस्थ होईल. या गाडीला २ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत हा जादा थांबा देण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी आणि शुक्रवारी ट्रॅफिक ब्लॉक

   Follow us on        

बेलापूर:कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक ३० एप्रिल २०२६ आणि १ मे २०२६ (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही गाड्यांच्या धावण्याच्या वेळेवर परिणाम होणार असून, प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. २२६२९ दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस: ही साप्ताहिक गाडी ३० एप्रिल रोजी नांदगाव रोड स्थानकावर १० मिनिटे थांबवून (Regulated) पुढे सोडली जाईल.

​गाडी क्र. १२२०२ तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्सप्रेस: ही गाडी ३० एप्रिल ते १ मे दरम्यान मडगाव जंक्शन ते नांदगाव रोड या पट्ट्यात ६० मिनिटे (१ तास) थांबवून चालवण्यात येईल.

​या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या विलंबाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे अधिकृत ॲप डाऊनलोड करावे किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

संगमेश्वर स्थानकावर ५ गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता

   Follow us on        

संगमेश्वर:कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि विशेषतः संगमेश्वरवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संतोष कुमार झा यांनी संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून ही बैठक पार पडली असून, यावेळी संगमेश्वरसाठी ५ महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

​या बैठकीत प्रामुख्याने ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी ५ गाड्यांबाबत लवकरच अनुकूल निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम स्पेशल गाडीला देखील संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. गाड्यांच्या थांब्यासोबतच प्रवाशांच्या तांत्रिक सोयीसाठी स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर ‘डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर’ बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आपला डबा नेमका कुठे येईल, याची अचूक माहिती मिळणे सोपे होणार आहे.

​केवळ स्थानकाचा विकासच नव्हे, तर प्रवासातील शिस्त आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी स्थानकावर दररोज तिकीट तपासनीस (TC) नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, पद्मश्री गजानन माने यांनी मांडलेल्या कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याच्या मागणीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मांडवी एक्सप्रेसला दिवा स्थानकावर थांबा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीला श्री. गंगाराम टोपरे, श्री. मुकुंद सनगरे आणि ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; वाहनांना धडक देऊन ट्रक विहिरीत कोसळला

   Follow us on        

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात आज पहाटे एक भीषण अपघात घडला. स्टीलने भरलेल्या एका भरधाव मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने त्याने महामार्गावरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर हा ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक ट्रकखालीच दबला गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अद्याप त्याच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या अपघातात इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने इतर कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या परिसरात वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

४८ तासांत ७ भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथे ‘मृत्यूचा सापळा’

   Follow us on        

संगमेश्वर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील ‘ड्राईव्ह-इन’ हॉटेलसमोरील रस्ता सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या अवघ्या ४८ तासांत या ठिकाणी सहा ते सात भीषण अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महामार्गावर करण्यात आलेल्या डायव्हर्शनच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हे अपघात होत असल्याचे समोर आले असून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आले असले तरी, तिथे आवश्यक मार्गदर्शन फलक किंवा रात्रीच्या वेळी दिसतील असे रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, योग्य बॅरिकेड्स लावण्याऐवजी रस्त्यावर थेट मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना हे अडथळे वेळेत दिसत नाहीत, त्यामुळे वाहने थेट मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून अपघात होत आहेत.

​गुरुवारी रात्री पुण्यातील एका प्रवाशाची कार अशाच प्रकारे मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली, ज्यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एअरबॅग उघडल्याने मोठी जीवितहानी टळली. याच दरम्यान दोन दुचाकीस्वारही जखमी झाले. या घटनांनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. परिणामी, शुक्रवारी रात्री पुन्हा अपघातांची मालिका सुरूच राहिली. यामध्ये एक इनोव्हा कार, रुग्णवाहिका आणि दोन-तीन दुचाकी या सापळ्यात अडकल्या. आरवली ते कांते दरम्यान सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

तुतारी एक्सप्रेसमधून दारूची अवैध वाहतूक; रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सध्या विशेष सतर्क झाले आहे. याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि सी अँड आय (C&I) कर्मचाऱ्यांनी एका मोठी कारवाई केली. ट्रेन क्रमांक ११००४, म्हणजेच तुतारी एक्सप्रेसमध्ये ३५ दारूच्या बाटल्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला पथकाने रंगेहात पकडले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नियमित तपासणी (Routine Checking) करत असताना त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने तुतारी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये जाऊन झाडाझडती घेतली असता, कोच अटेंडंटकडे विदेशी दारूचा अवैध साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचाच अशा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.

​या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कडक आवाहन केले आहे. रेल्वेतून दारू, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणतेही प्रतिबंधित अंमली पदार्थ वाहून नेणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे.

श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव.

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो, यंदा हा उत्सव गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची अप्रतिम रंगरंगोटी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजविण्यात आले आहे. सदर रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री सतीश राव, सीपीएमसी, मुंबई यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा, मुंबई यांनी केले आहे.

चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करतील. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवतील व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतील. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाईल. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जाईल. रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पालखीत *कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी* या देवतांची रुपी लावतील. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होईल. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या जातील. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होईल. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृश्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या नंतर सालाबादप्रमाणे रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतील. सदर वेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाईल आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता होईल.

तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची घोषणा

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण आणि सर्वांकष विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा सरकारचा मानस आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे. कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने पर्यटन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन (विशेषतः आंबा, काजू, कोकम प्रक्रिया) आणि कौशल्य विकास या क्षेत्रांवर विशेष भर दिला जातो. सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी आणि सुमारे ३०० कोटींच्या निधीसह सुरू झालेल्या या योजनेच्या यशानंतर, आता सरकारने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ प्रस्तावित केली आहे. या नवीन टप्प्यामुळे कोकणच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक उद्योगांचा विस्तार होऊन पर्यायाने कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त होईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search