सावंतवाडी :
राज्यातील शेतकरी आणि जनतेसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून, त्याची मजल आता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘हर्णे’ बंदरापर्यंत पोहोचली आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल ८ जून रोजी मान्सूनची उत्तर सीमा महाराष्ट्रातील हर्णे (दापोली, रत्नागिरी) आणि सोलापूर या भागातून जात आहे. देशाचा विचार केला तर ही सीमा हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंदीयाल, चेन्नई, लखीमपूर या भागांमधून जात आहे. मान्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा आणखी काही भाग व्यापत पुढे कूच केली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तामिळनाडू, बंगालचा उपसागर, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनासोबतच दमदार पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.


