मुंबई:
मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून (सफेद पट्टी) मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने या प्रकाराविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवला असून, आता त्याला इमारतीतील काही व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे. सुरक्षेचा विचार करता प्रसादने पोलीस संरक्षणाची मागणी केली असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस त्याच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
प्रसाद वेदपाठकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की, सोसायटी कमिटीमधील काही जैन सदस्यांनी इतर रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची परवानगी न घेता इमारतीच्या आवारात (सामायिक जागेत) ही परमनंट पांढरी पट्टी मारली आहे. सामायिक जागेचा हा गैरवापर असल्याचा आरोप करत त्याने म्हटले की, धार्मिक मान्यता पाळायच्या असल्यास साधुसंतांना खांद्यावर घेऊन घरी न्यावे, पण असे प्रकार करू नयेत. यामुळे सर्वसामान्य रहिवाशांना मानसिक मनस्ताप होत असून सोसायटीनं सर्वांची माफी मागून ही पट्टी तातडीने काढावी, अशी मागणी त्याने केली आहे.
माध्यमांशी बोलताना प्रसादने तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या २५ वर्षांपासून या इमारतीत जैन धर्मगुरू येत असून आपण त्यांचा आदरच करतो, परंतु अशी पट्टी पहिल्यांदाच मारण्यात आल्याचे त्याने सांगितले. “आम्ही इथले मूळ रहिवाशी, भूमीपुत्र असूनही आम्हाला साध्या गोष्टीसाठी विचारले गेले नाही. प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर इतर समाजानं अशाच प्रकारे धार्मिक गोष्टी केल्या तर चालतील का?” असा सवाल करत त्याने स्थानिक मराठी रहिवाशांना यामागचं राजकारण समजून घेण्याचं आवाहन केलं आहे. बहुमताच्या विरोधात जाऊन आपण ही हिंमत दाखवली असली, तरी जबरदस्तीने किंवा कुणाला गृहीत धरून अशी एकरुपता आणता येत नाही, असे मत त्याने व्यक्त केले आहे. पोलिसांच्या तपासानंतर आता हा वाद काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


