मुंबई:
रेल्वे प्रवाशांची फसवणूक आणि लूट करणाऱ्या अवैध तिकीट दलालांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) मोठी धडक मोहीम उघडली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत मध्य रेल्वेने तब्बल १,६७६ गुन्हे दाखल करत १० कोटी ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची तिकिटे जप्त केली आहेत.
सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या काळात सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण होते. या गैरसोयीचा फायदा घेऊन अवैध दलाल आणि अनधिकृत एजंट्स तिकिटांचा काळाबाजार करतात. आरपीएफने अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने तपास करत गेल्या ५ वर्षांत ९ कोटी ६२ लाख रुपयांची ई-तिकिटे आणि ८८ लाख ४९ हजार रुपयांची जेसीआर तिकिटे जप्त केली आहेत.
या कारवाईअंतर्गत आरपीएफने तब्बल १,६४१ दलाल आणि ४१० बेकायदेशीर एजंट्सना अटक करून गजाआड केले आहे. या धडक मोहिमेमुळे अवैध तिकीट विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण तिकीट घोटाळ्यात केवळ बाहेरील दलालच नाही, तर घरभेदी म्हणून रेल्वेचे काही कर्मचारीही सामील असल्याचे उघडकीस आले आहे. तपासादरम्यान अवैध तिकीट विक्रीच्या साखळीमध्ये सहभाग आढळलेल्या ७ रेल्वे कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आरपीएफच्या या सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाईमुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे


