महापुरात अडकले शेतकरी, ‘सह्याद्री रेस्क्यू’ने वाचवले प्राण!

   Follow us on        

सावंतवाडी:

नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या महापुरात अडकल्याची एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना नुकतीच घडली. या परिसरामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात भात लावणीचे काम करत होते. मात्र, दुपारच्या सुमारास आंबोली आणि परिसरामध्ये अचानक ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना प्रचंड पूर आला आणि पाण्याचा प्रवाह तसेच पातळी अत्यंत वेगाने वाढली. आंबोली पापडी पुलाच्या खाली असलेल्या आसोलकर मळ्यात काम करणारे हे चारही शेतकरी काही समजण्याच्या आतच पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकले. पाण्याचा वेग इतका तीव्र होता की त्यांना स्वतःहून बाहेर पडणे अशक्य झाले होते. यामध्ये रामू जंगले, भागी जंगले यांच्यासह अन्य दोघांचा समावेश होता.

​या जीवघेण्या संकटाची माहिती मिळताच आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर राहणाऱ्या ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप’ (आंबोली-सांगली) च्या जवानांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पुराच्या पाण्याचा भयानक प्रवाह आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेस्क्यू टीममधील धाडसी जवान उत्तम नार्वेकर, सुजित नायर, मायकल डिसोजा, संतोष पालयेकर, राजू राऊळ आणि नारायण चव्हाण यांनी आपल्या जीवाची अजिबात पर्वा न करता थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात उड्या घेतल्या. या जवानांनी अत्यंत कुशलतेने, अथांग धैर्याने आणि जीवाची बाजी लावून पाण्यात अडकलेल्या चारही जणांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने एक-एक करून चारही शेतकऱ्यांना सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले.

 

सह्याद्री रेस्क्यू ग्रुपने दाखवलेल्या या अद्भूत तत्परतेमुळे आणि अतुलनीय धाडसामुळे चार निरपराध शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे रेस्क्यू टीममधील जवानांचे आणि संपूर्ण ग्रुपचे सावंतवाडी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत असून, संकटकाळात हा ग्रुप नेहमीच देवदूत बनून मदतीला धावून येतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आली

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search