मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाविरोधात खासदार अरविंद सावंत आक्रमक

   Follow us on        

​नवी दिल्ली:उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला मध्य रेल्वेकडून येत असलेल्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. मध्य रेल्वेचे धोरण ‘उत्तर भारत केंद्रित’ असल्याचा आरोप करत सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना एक सविस्तर पत्र सादर करून कोकणवासीयांच्या भावना आणि आकडेवारीनिशी रेल्वेचा दुजाभाव त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

​खासदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्य रेल्वेने १९ मार्गांवर एकूण १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले असताना, त्यातील तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी आणि ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो प्रवासी ज्या कोकण मार्गावर अवलंबून असतात, तिथे केवळ ३६ गाड्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर भारतासाठी धावणाऱ्या गाड्या दररोज उपलब्ध आहेत, तर मुंबई-मडगाव विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान आठवड्यातून केवळ एकदाच सोडली जाणार आहे. हा विरोधाभास संतापजनक असून कोकणी प्रवाशांची क्रूर थट्टा असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.

​नियमित गाड्यांची स्थितीही बिकट असून मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सारख्या गाड्यांच्या स्लीपर क्लासची वेटिंग लिस्ट १०० च्या पुढे गेली आहे. सध्या कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आणि घाटातील वाहतूक कोंडी पाहता रेल्वे प्रवास हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करावी, विशेष गाड्यांच्या फेऱ्या ‘दररोज’ कराव्यात आणि अतिरिक्त रेक्स (डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत. हा अन्याय त्वरित दूर न झाल्यास कोकणच्या जनतेचा उद्रेक होईल आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.

Facebook Comments Box

शालेय अभ्यासक्रमातून मराठी विषय डावलणाऱ्या शाळांविरुद्ध राज्य सरकार आक्रमक

   Follow us on        

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत सविस्तर कार्यपद्धती निश्चित करून शासन निर्णय जारी केला आहे.या निर्णयानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस दिली जाईल आणि १५ दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. खुलासा समाधानकारक न झाल्यास शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील.

शाळेला निर्णयाविरुद्ध ३० दिवसांच्या आत अपील करण्याची संधी दिली जाईल. अपिलानंतरही आदेशाचे पालन न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन तीन महिन्यांच्या आत करण्यात येणार आहे.

या उपाययोजनांमुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबीसह) आणि खासगी-सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन सुनिश्चित होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून तिचे संवर्धन आणि नव्या पिढीला मातृभाषेचे ज्ञान देणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत आहे.

Photo Credit – AI

 

 

Facebook Comments Box

एसटी प्रवाशांवर दोन रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’; सुट्या पैशांवरून वाहक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाद

   Follow us on        

मुंबई:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (Cleanliness Surcharge) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना अतिरिक्त दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेषतः ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत १०० टक्के सवलत मिळणाऱ्या प्रवाशांनाही आता हे दोन रुपये द्यावे लागत असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

​या नवीन नियमामुळे बसमध्ये सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांच्यात शाब्दिक चकमकी होत असल्याचे समोर आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी पूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत होती, ते आता अतिरिक्त दोन रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून यूपीआय (UPI) पेमेंटचा पर्याय उपलब्ध असला तरी, गेल्या आठवड्यात सर्व्हर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जाऊनही महामंडळाच्या खात्यात ते जमा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे मशीनमधून तिकीट निघत नसल्याने वाहकांची मोठी पंचाईत होत आहे.

​महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. महामंडळाची ही स्वच्छता योजना हेतूने चांगली असली तरी, दोन रुपयांच्या वसुलीमुळे रोज सुमारे अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांमध्ये वाद होत आहेत. या वादांमुळे एसटीची बदनामी होत असून, प्रशासनाने यावर काहीतरी सुवर्णमध्य किंवा तोडगा काढावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे. दरम्यान, ‘महिला सन्मान योजना’ आणि इतर सवलतधारक प्रवाशांच्या बाबतीत हा अधिभार नक्की कसा लागू राहील, याबाबत अद्याप काही संभ्रम कायम आहेत.

Facebook Comments Box

वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त, चौघांना अटक


   Follow us on        

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा परिसरात वनविभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) तस्करी उघडकीस आणली आहे. या धाडसी कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची बाजारपेठेत किंमत अंदाजे ७ कोटी रुपये इतकी मोठी आहे. याप्रकरणी वनविभागाने चार संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.

​बनावट ग्राहक बनून रचला सापळा

शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्री. सचिन शिदतूरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक, सावंतवाडी) यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून तस्करी करणाऱ्यांशी संपर्क साधला आणि सापळा रचला. गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास व्यवहार निश्चित झाल्यावर वनविभागाने या आरोपींना रंगेहात पकडले.

​आरोपींची नावे आणि कारवाईत सहभागी पथक

या प्रकरणात रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा) आणि निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. मिलीश शर्मा, विभागीय वनअधिकारी श्री. संजय वाघमोडे आणि साहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वनक्षेत्रपाल सचिन शिदतूरे, अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील आणि अन्य वनरक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​अंबरग्रीस हे अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानले जाते, त्यामुळे केवळ पैशांच्या हव्यासापोटी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही तस्करीबद्दल माहिती मिळाल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाकडून फणस काढण्याची मोहीम

   Follow us on        

उदगमंडलम: गुडलूर वनविभागाने गुडलूर आणि पंडालूर भागातील निवासी क्षेत्रांनजीक असलेल्या झाडांवरील पिकलेले फणस काढण्यास सुरुवात केली आहे. मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येणाऱ्या हत्तींना रोखणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचे (MTR) क्षेत्र संचालक आणि गुडलूरच्या विभागीय वनअधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चेरांबाडी वनपरिक्षेत्रात ही कार्यवाही केली जात आहे. केवळ घरांच्या जवळ असलेल्या झाडांवरील फणस संबंधित जमीनमालकांच्या संमतीने आणि वनविभागाच्या मदतीने काढले जात आहेत.

​वनविभागाच्या मते, ही एक वार्षिक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हत्ती अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता जास्त असते आणि फणसाचा सुगंध त्यांना वस्तीकडे आकर्षित करतो, ज्यामुळे संघर्षाच्या घटना घडू शकतात. हे टाळण्यासाठी वनविभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या घराभोवतीचे पिकलेले फणस स्वत: काढून टाकावेत किंवा मदतीसाठी वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय, हत्तींना पाण्यासाठी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी राखीव जंगलातील पाण्याच्या टाक्या भरण्याचे कामही विभागाने सुरू केले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्यांची संख्या अपुरी

मुंबई: आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने तातडीने अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी आग्रही मागणी ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ने केली आहे. एप्रिल ते जून या काळात मुंबई आणि पुणे येथून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. यामध्ये प्रामुख्याने सुट्ट्यांसाठी गावी जाणारे चाकरमानी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा समावेश असतो. सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची संख्या या गर्दीच्या तुलनेत अत्यंत अपुरी असून, जाहीर करण्यात आलेल्या साप्ताहिक विशेष गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झालेली नाही. साप्ताहिक फेऱ्यांमुळे प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागत असून, नाइलाजास्तव असुरक्षित पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.

​प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने सीएसएमटी-चिपळूण, सीएसएमटी-सावंतवाडी रोड आणि पुणे-सावंतवाडी रोड या मार्गांवर विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गाड्यांचे वेळापत्रकही सुचवण्यात आले असून, या फेऱ्या साप्ताहिक न ठेवता द्वि-साप्ताहिक किंवा दैनंदिन स्वरूपात चालवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः पुणे-सावंतवाडी मार्गावरील मागणीचा विचार करून प्रवाशांच्या सोयीनुसार वेळ निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

​कोकण रेल्वेवरील वाढता भार आणि प्रवाशांची सुरक्षितता विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे. उन्हाळी हंगामातील हा गर्दीचा ओघ दरवर्षीचा असून, त्याचे नियोजन आधीच होणे आवश्यक आहे. जर रेल्वेने वेळेत अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली, तर प्रवाशांना आपले आरक्षण सुलभतेने करता येईल आणि रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होईल. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

 

Facebook Comments Box

मराठी भाषेला दुय्यम स्थान; मध्य रेल्वेला शिवसेनेचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील सूचनाफलकांवरून मराठी भाषा गायब झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असूनही रेल्वे स्थानकांवर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करून स्थानिक मराठी भाषेला डावलले जात असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले व या प्रकाराचा जाब विचारला.

​सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, तिथे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे घटनात्मक आणि शासकीय धोरणानुसार आवश्यक आहे. असे असतानाही मराठीला डावलणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. जर रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व सूचनाफलकांवर मराठी भाषेचा समावेश केला नाही, तर शिवसेना आपल्या ‘परंपरागत’ पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संतोष शिंदे यांनी यावेळी दिला.

​या प्रसंगी विभाग संघटक युगंधरा साळेकर, युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या विषयावर सकारात्मक कार्यवाही न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला रेल्वे प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

तुतारी एक्सप्रेसमधून दारूची अवैध वाहतूक; रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सध्या विशेष सतर्क झाले आहे. याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि सी अँड आय (C&I) कर्मचाऱ्यांनी एका मोठी कारवाई केली. ट्रेन क्रमांक ११००४, म्हणजेच तुतारी एक्सप्रेसमध्ये ३५ दारूच्या बाटल्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला पथकाने रंगेहात पकडले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नियमित तपासणी (Routine Checking) करत असताना त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने तुतारी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये जाऊन झाडाझडती घेतली असता, कोच अटेंडंटकडे विदेशी दारूचा अवैध साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचाच अशा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.

​या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कडक आवाहन केले आहे. रेल्वेतून दारू, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणतेही प्रतिबंधित अंमली पदार्थ वाहून नेणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे.

Facebook Comments Box

सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ पडली महागात! विर्डीच्या जंगलात अडकलेल्या ५ विद्यार्थ्यांची थरारक सुटका.

   Follow us on        

दोडामार्ग (प्रतिनिधी): सोशल मीडियावरील माहिती पाहून विर्डी परिसरातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गोव्यातील पाच पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात जाणे चांगलेच महागात पडले. मात्र, दोडामार्ग पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे या पाचही विद्यार्थ्यांची मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय? गोव्यातील पणजी-आक्षी येथील चार मुले आणि एक मुलगी असे पाच जण विर्डी गावातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत धबधब्याचा आनंद लुटल्यानंतर, परतीचा मार्ग शोधताना हे विद्यार्थी रस्ता चुकले. मोबाईलचे कमकुवत नेटवर्क, सभोवताली घनदाट जंगल आणि हिंस्र वन्यप्राण्यांचे आवाज यामुळे हे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते.

पोलिसांची धाडसी मोहीम: घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी ७:१५ वाजता ‘११२’ क्रमांकावर कॉल करून मदतीची विनंती केली. नागपूर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांना तातडीने सूचना दिल्या. दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक मानसी गावडे आणि पोलीस हवालदार बाळकृष्ण गवस यांनी विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.

जंगलात वाहन जाण्यास मार्ग नसल्याने पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन पायी शोधमोहीम सुरू केली. हा परिसर अस्वल, वाघ आणि कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असलेला भाग असल्याने ही मोहीम अत्यंत जोखमीची होती.

चार तासांनंतर लागला शोध: सुमारे चार तास उपाशीपोटी आणि भीतीपोटी नदीकाठी थरथरत बसलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर रात्री १०:४५ च्या सुमारास शोध पथकाने शोधून काढले. पोलिसांचा आवाज ऐकताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “आम्ही प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परतलो,” अशी भावना सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या पर्यटकांना जंगलाबाहेर काढून त्यांच्या दुचाकींपर्यंत सुरक्षित पोहोचवले.

प्रशासनाचे आवाहन: विर्डीचे जंगल निसर्गाने समृद्ध असले तरी तेवढेच धोकादायक आहे. त्यामुळे पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाताना खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

ॲप आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात टॅक्सी चालकांचा पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास

   Follow us on        

मुंबई: अॅप-आधारित टॅक्सी कंपन्यांकडून होणारी पिळवणूक आणि अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील तीन कॅब चालकांनी सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास करून मुंबई गाठली आहे. परमेश्वर घोंगे, संतोष दुर्गे आणि वैभव भेगडे या ‘महाराष्ट्र कामगार सभे’शी संबंधित चालकांनी १० एप्रिल रोजी पुण्याहून या ‘न्याय पदयात्रे’ला सुरुवात केली होती. तळपत्या उन्हात, पायाला फोड येऊनही केवळ निर्धाराच्या जोरावर लोणावळा, खालापूर, पनवेल आणि वाशीमार्गे त्यांनी बुधवारी मुंबईत प्रवेश केला. हे चालक १५ एप्रिल रोजी आझाद मैदानावर पोहोचून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत.

​या आंदोलनाचा मुख्य उद्देश कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करणे हा आहे. आंदोलक चालकांच्या म्हणण्यानुसार, ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या सरकारनं ठरवून दिलेल्या भाडेदरांचे पालन करत नाहीत. याशिवाय, ‘पॅनिक बटण’च्या नावाखाली चालकांकडून वारंवार केली जाणारी कपात, कमिशनमधील पारदर्शकतेचा अभाव आणि मुंबई-नागपूर सारख्या शहरांत विनापरवाना सुरू असलेल्या ‘बाईक टॅक्सी’मुळे होणारे नुकसान यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, हा लढा चालकांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत शासन यावर ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील. दरम्यान, परिवहन विभागाने या कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश वारंवार दिले असल्याचे सांगत, कंपन्या एकमेकांवर बोट ठेवून जबाबदारी टाळत असल्याचा दावा केला आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search