Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार

   Follow us on        

नागपूर:विदर्भ आणि कोकणला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर-मडगाव-नागपूर या मार्गावर धावणारी विशेष रेल्वे (०११३९/०११४०) आता रेल्वे बोर्डाने नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस या नवीन क्रमांकाने धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि दिवस:

ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे:

​१. गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव): ही गाडी दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता नागपूरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि सायंकाळी १७:४५ वाजता मडगावला पोहोचेल.

​२. गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर): ही गाडी मडगावहून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री २०:०० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५:१५ वाजता रोहा येथे येईल आणि रात्री २१:३० वाजता नागपूरला पोहोचेल.

प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाडीला महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:

​वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.

​गाडीची संरचना:

ही गाडी एकूण २४ डब्यांची (ICF कोच) असेल. यामध्ये जनरल ५ डबे, स्लीपर ११ डबे, ३-टियर एसी ५ डबे, २-टियर एसी १ डबा आणि २ गार्ड/लगेज डबे असतील.

या गाडीची प्राथमिक देखभाल नागपूर येथे केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ आणि पनवेल येथे गाडीत पाणी भरण्याची सोय केली जाईल. रेल्वे बोर्डाचे संचालक (कोचिंग) संजय आर. नीलम यांनी या संदर्भात आदेश जारी केले असून, ही सेवा लवकरच अधिकृत तारखेसह नियमितपणे सुरू केली जाणार आहे.

ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष रेल्वे म्हणून धावताना या गाडीचे तिकीट दर जास्त होते, मात्र आता नियमित एक्स्प्रेस झाल्यामुळे तिकीट दरात कपात होणार आहे. तसेच, या गाडीला आता कायमस्वरूपी वेळापत्रक मिळाल्याने ही गाडी अधिक वेळेवर धावण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि निश्चित वेळेत पूर्ण होईल.

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी आणि शुक्रवारी ट्रॅफिक ब्लॉक

   Follow us on        

बेलापूर:कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक ३० एप्रिल २०२६ आणि १ मे २०२६ (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही गाड्यांच्या धावण्याच्या वेळेवर परिणाम होणार असून, प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. २२६२९ दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस: ही साप्ताहिक गाडी ३० एप्रिल रोजी नांदगाव रोड स्थानकावर १० मिनिटे थांबवून (Regulated) पुढे सोडली जाईल.

​गाडी क्र. १२२०२ तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्सप्रेस: ही गाडी ३० एप्रिल ते १ मे दरम्यान मडगाव जंक्शन ते नांदगाव रोड या पट्ट्यात ६० मिनिटे (१ तास) थांबवून चालवण्यात येईल.

​या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या विलंबाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे अधिकृत ॲप डाऊनलोड करावे किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Facebook Comments Box

Railway Updates: जनशताब्दी,शताब्दी एक्सप्रेस गाड्यांची आसन व्यवस्था बदलणार

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांच्या व्यापक आधुनिकीकरणासाठी मोठा उपक्रम हाती घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेसमध्ये केलेल्या सुधारणा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना विद्यमान डब्यांची तपासणी करून त्रुटी ओळखण्याचे आणि ठराविक कालावधीत आवश्यक सुधारणा पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांच्या आरामात वाढ करणे हा आहे. जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांमध्ये सध्या असलेली आसनव्यवस्था प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. खास करून सेकंड सीटींग डब्याची आसने जी तीन प्रवाशांसाठी आहेत ती खूप छोटी आहेत. या आसनावर तीन प्रवासी नीट बसू शकत नाही. यावर उपाय म्हणुन आता नव्या कुशनसह आसनव्यवस्था बनवली जाणार आहे. तसेच शौचालयांची सुधारित रचना व उत्तम ड्रेनेज व्यवस्था, तसेच मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि स्नॅक टेबल्समध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान होणारे धक्के कमी करण्यासाठी तांत्रिक बदल केले जाणार असून त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होईल. याशिवाय डब्यांचे आतील भाग, फ्लोअरिंग, पॅनेल्स आणि व्हेस्टिब्युल क्षेत्रांचे नूतनीकरण करून टिकाऊपणा व आकर्षकता वाढवली जाईल.

सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून प्रवासी घोषणा व माहिती प्रणाली (PAPIS) अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह केली जाईल. डब्यांतील प्रकाशयोजना सुधारली जाईल तसेच बाहेरील गंतव्य फलक अधिक स्पष्ट करण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

सध्या देशभरात सुमारे २५ जोड्या शताब्दी एक्सप्रेस आणि २० हून अधिक जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या विविध शहरांना जोडतात. या सुधारणा उपक्रमामुळे लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरीत्या उंचावेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच, वाढत्या प्रवासी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी भारतीय रेल्वेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Facebook Comments Box

कुडाळमध्ये अवैध बंदूक निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

   Follow us on        

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे – सुतारवाडी येथे अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी हा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्रांचा साठा आणि साहित्य जप्त केले आहे. या कारवाईने संपूर्ण निरुखे पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.

​जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला निरुखे – सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध शस्त्रांची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नियोजित पद्धतीने छापा टाकला. अंधाराचा फायदा घेत सुरू असलेला हा काळा धंदा पोलिसांनी उघडकीस आणला.

​या छाप्यात पोलिसांनी १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३ तयार बंदुका, ६ लोखंडी बॅरल, बंदुकीचे ४ लाकडी बट आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. ही सर्व हत्यारे आणि साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, हा साठा पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.

​याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (६५, रा. निरुखे – सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या थेट सूचनेनुसार ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

​दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मेस्त्री याने यापूर्वी अशा प्रकारे किती बंदुका तयार केल्या आणि त्या कोणाकोणाला विकल्या, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या कारखान्यातून यापूर्वी अनेक बंदुकांची विक्री झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

सीएसएमटी-खोपोली लोकलमध्ये रेल्वे प्रवाशावर चाकू हल्ला करणारा चोरटा जेरबंद

   Follow us on        

अंबरनाथ: मुंबई-खोपोली लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर चाकूने हल्ला करणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. जेव्हा ट्रेन विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात आली, तेव्हा एका चोरट्याने सामानाच्या डब्यात चढून नितीशकुमार नावाच्या व्यावसायिकाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरीचा हा प्रयत्न अश्लील ठरल्याने संतप्त झालेल्या चोरट्याने नितीशकुमार यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि झटापटीनंतर उल्हासनगर स्थानकात उतरून पळ काढला.

​या घटनेची तक्रार प्राप्त होताच आरपीएफ उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जीआरपीच्या मदतीने तांत्रिक तपास करून अवघ्या दोन दिवसांत आरोपीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. जोगिंदर अवतार सिंग लबाना (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जखमी प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्राथमिक उपचार देऊन त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेतली होती. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

सीएसएमटी स्थानकावर फलाट विस्तारीकरणाचे काम; कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई : मुंबई सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ च्या विस्तारकामामुळे काही गाड्यांचे अंतिम थांबे तात्पुरते बदलण्यात आले असून ही मुदत आता २७ एप्रिल २०२६ ते १९ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना काही दिवस पर्यायी व्यवस्था लक्षात घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

या निर्णयानुसार मडगाव जंक्शन–मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (गाडी क्र. २२१२०) ही २६ एप्रिल ते १७ मे २०२६ दरम्यान दादर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट होणार आहे. तसेच मंगळुरू जंक्शन–मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४) ही २६ एप्रिल ते १८ मे २०२६ या कालावधीत ठाणे स्थानकावरच प्रवास समाप्त करणार आहे.

या बदलांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

मुळशी धरण परिसरातील दुर्गम गावांसाठी फेरी बोटसेवा सुरू; प्रवासाचे अंतर २० ते २५ किमीने कमी होणार

   Follow us on        

मुळशी: मुळशी धरण परिसरातील दुर्गम गावांच्या दळणवळणात मोठी भर घालत, मुळशी ते वाघवाडी दरम्यान प्रवासी ‘लाँच’ सेवेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला. या उद्घाटन समारंभाला आमदार शंकर मांदेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती मंदा शेळके, माजी आमदार शरद ढमाले, कृषी समिती सभापती अमोल नलावडे यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

​या नवीन लाँच सेवेचा फायदा मुळशी धरणाच्या जलाशयाभोवती असलेल्या १६ गावांतील रहिवाशांना होणार आहे. ही गावे दीर्घकाळापासून खराब रस्ते आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्यांशी झुंजत होती. थेट जलमार्ग उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मुख्य रस्त्याने मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असे. आता या लाँच सेवेमुळे प्रवासाचे अंतर तब्बल २० ते २५ किलोमीटरने कमी होणार असून वेळेचीही मोठी बचत होणार आहे. वाघवाडी, शिरगाव, वडगाव, वदुस्ते, भदास खोंडा, निंबरवाडी, भोरकस आणि वांद्रे यांसारख्या गावांना या सेवेचा थेट लाभ मिळणार आहे.

​याप्रसंगी बोलताना आमदार शंकर मांदेकर यांनी सांगितले की, काही प्रशासकीय कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता, परंतु आता निवडणुका संपल्या असल्याने या भागातील विकासकामांना वेग येईल. तसेच मुळशी धरण परिसरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, ही सेवा नफा कमावण्यासाठी नसून केवळ देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी चालवली जाणार आहे.

​सध्या या सेवेसाठी प्रौढांना २० रुपये, मुलांना १० रुपये आणि मोटारसायकल वाहतुकीसाठी ५० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अल्प उत्पन्न असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि धरणग्रस्तांनी हे दर जास्त असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने भाडेरचनेत बदल करण्याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना अत्यावश्यक सेवांपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

तात्काळ बूकिंगसाठी ‘रेलवन’ बेभरवशाचे

   Follow us on        

नवी दिल्ली:भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या थाटामाटात लाँच केलेले नवीन ‘RailOne’ अॅप सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जुलै २०२५ मध्ये CRIS द्वारे विकसित केलेले हे अॅप ‘अपग्रेडेड’ आणि ‘अधिक विश्वासार्ह’ असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तत्काल तिकीट बुकिंगच्या वेळी या अॅपला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, सकाळी तत्काल बुकिंग सुरू होताच अॅपवर ‘कनेक्शन इश्यू’ आणि ‘अनेबल टू प्रोसेस रिक्वेस्ट’ (Unable to Process Request) असे संदेश दिसू लागतात, ज्यामुळे तिकीट बुक करणे अशक्य होत आहे.

​सोशल मीडियावर रेल्वे प्रवाशांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, तत्काल कोटा सुरू होताच काही सेकंदांत सर्व सीट संपल्याचे दाखवले जाते, परंतु सामान्य प्रवाशांना मात्र बुकिंग प्रक्रियेत सतत अडथळे येतात. प्रवाशांच्या मते, नवीन अॅपपेक्षा जुने ‘IRCTC Rail Connect’ अॅप अधिक विश्वासार्ह होते. RailOne अॅपमध्ये अचानक लॉगआउट होणे, खात्यातून पैसे कापले जाऊनही तिकीट न मिळणे आणि सर्व्हर ओव्हरलोड होणे यांसारख्या गंभीर समस्या गेल्या अनेक आठवड्यांपासून कायम आहेत.

​या तांत्रिक बिघाडामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे नुकसान होत असून, नाईलाजास्तव त्यांना एजंट्सकडे धाव घ्यावी लागत आहे. एजंट्सकडून तिकीटासाठी अव्वाच्या सव्वा फी उकळली जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी सर्व्हरची क्षमता वाढवल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्ष कामाच्या वेळी तो फोल ठरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणात लक्ष घालून RailOne अॅपमधील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Facebook Comments Box

मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस रुळांवरून घसरली

   Follow us on        

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास २२२२५ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकातील ‘डायमंड क्रॉसिंग’वर ही दुर्घटना घडली असून, गाडीचा चौथा कोच डिरेल झाला. या कोचच्या ट्रॉलीचे (चाकांचे संयोजन) रुळावरून खाली उतरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गाडीचा वेग कमी असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

​या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत संबंधित डायमंड क्रॉसिंगचे अपग्रेडेशन करण्याचे काम आधीच नियोजित होते, त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याने तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने तातडीने पर्यायी रेकची व्यवस्था केली. या अपघातामुळे पुणे विभागातील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, मुख्य स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

View this post on Instagram

 

Facebook Comments Box

मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; बिर्याणीनंतर खाल्लेले कलिंगड ठरले जीवघेणे?

   Follow us on        

मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित अन्न विषबाधेमुळे (फूड पॉयझनिंग) ही हृदयद्रावक घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (१६) व जैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री डोकाडिया कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर एका नातेवाईकाने आणलेले तरबूजही त्यांनी खाल्ले. जेवणानंतर काही वेळातच कुटुंबातील या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. विशेष म्हणजे, ज्या सदस्यांनी फक्त बिर्याणी खाल्ली होती, त्यांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र, ज्यांनी बिर्याणी आणि त्यानंतर तरबूज खाल्ले होते, त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे पोलिसांचा संशय आता तरबूजावर अधिक बळावला आहे.

​प्रकृती खालावल्याने या चौघांनाही तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २६ एप्रिल रोजी दुर्दैवाने या चौघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. “अन्न विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एकाच घरातील हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search