Author Archives: Kokanai Digital

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा केबल स्टेड पूल लवकरच सेवेत; अंतर ५० किमीने कमी होणार!

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी केबल स्टेड पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर तब्बल ४५ ते ५० किलोमीटरने कमी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रवाशांना पोलादपूरचा प्रदीर्घ आंबेनळी घाट पार करावा लागायचा, मात्र आता या पुलामुळे हा वेळखाऊ मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्गावरून पलीकडे थेट तापोळा व कास रस्ते मार्गे सातारा आणि महाबळेश्वरला जाता येणे शक्य होईल. नुकतीच या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली असून, पावसाळ्यानंतर किंवा आगामी दिवाळी दरम्यान हा पूल सर्वसामान्य जनतेच्या आणि वाहतुकीच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती समोर आली आहे.

​मुंबईतील प्रसिद्ध वरळी सागरी सेतूच्या (सी-लिंक) धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा केबल स्टेड पूल पहिल्यांदाच उभारला जात आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर (गाढवली अहिर) या दरम्यान कोयना नदीच्या पात्रावर आणि जावळीच्या खोऱ्यात हा पूल साकारत आहे. सुमारे १७५ कोटी रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पाची लांबी ५४० मीटर आणि रुंदी १४ मीटर आहे. या पुलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीवर एक अत्याधुनिक ‘व्ह्यू गॅलरी’ (Viewing Gallery) उभारण्यात आली आहे, जिथे जाण्यासाठी पर्यटकांना कॅप्सूल लिफ्टची सुविधा असेल. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंनी जिन्यांचे मार्गही तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे काम ‘टी अँड टी’ या कंपनीकडे असून, युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हा पूल पहिल्यांदा प्रस्तावित झाला होता, परंतु पुढे या कामाला खरी गती मिळाली.

​या पुलाच्या मुख्य संरचनेचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, व्ह्यू गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना खोरे परिसरातील या पुलाबरोबरच इतर तीन पुलांची कामेही वेगात सुरू आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दरे गाव ते कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणाऱ्या आणखी एका ३०० कोटी रुपयांच्या पुलाचा समावेश आहे. या नवीन पुलांमुळे पावसाळ्यात कोयना बॅकवॉटरमधील धोकादायक असणारी ‘बार्ज’ (नौका) सफर प्रवाशांना टाळता येईल. या पायाभूत सुविधांमुळे पावसाळ्यातही हा परिसर उर्वरित महाराष्ट्राशी जोडलेला राहील. तसेच मुनावळे बोटिंग क्लब, मुनावळे ते वासोटा किल्ला दरम्यान होणारा रोपवे आणि इतर पर्यटन सुविधांमुळे या भागात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

‘दिवा-संगमेश्वर’ मेमू सेवा सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

खेड: गणेशोत्सव तसेच इतर सणासुदीच्या काळात दिवा स्थानकावरून सुटणाऱ्या विशेष ‘दिवा-चिपळूण मेमू रेल्वे’ सेवेचा विस्तार करावा आणि ती थेट दिवा ते संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेला एक रीतसर निवेदनही देण्यात आले आहे. ही मेमू सेवा भविष्यात संगमेश्वरपर्यंत सुरू झाल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कढवई तसेच परिसरातील प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

​विशेषतः गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात गावी ये-जा करताना चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा प्रवाशांना प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबई व उपनगरांकडे नियमित प्रवास करत असतात. त्यामुळे या मार्गावर एक स्वतंत्र मेमू सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे.

​दिवा-संगमेश्वर मेमू सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल. शिवाय सणासुदीच्या काळात तसेच नियमित दिवसांमध्येही या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्याने या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

​दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सदरम्यान दुर्घटना; अंबरनाथमधील महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण येथील प्रसिद्ध दांडी समुद्रकिनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बनाना राईड (Banana Ride) करत असताना समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे मुंबईजवळील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात आणि पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शीतल मठकर या आपल्या पती, मुलगा, दीर आणि भावजय यांच्यासह एकूण नऊ जणांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी मालवण-देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबाग येथील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर, शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व कुटुंब दांडी किनारपट्टीवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

​दांडी समुद्रात बनाना राईड करत असताना अचानक शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या आणि त्यांची प्रकृती खालावली. त्या पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्थानिक यंत्रणा आणि कुटुंबियांनी त्यांना तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टर पर्यटकाने त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार (First Aid) केले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी शीतल यांची तपासणी केली, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे मठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गोवा-कोकणात पर्यटनाचा बेत आखत असाल तर ही बातमी वाचाच

   Follow us on        

गोवा:मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये गोवा आणि कोकणात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी इंधनाचा साठा संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करत कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता थेट पर्यटन क्षेत्राला या इंधन टंचाईची झळ बसू लागली आहे.

​इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्यामुळे पेट्रोल पंप चालक हवालदिल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महामार्गावरील काही पंपांवर वाहनांना केवळ हजार ते पंधराशे रुपयांचेच मर्यादित पेट्रोल-डिझेल दिले जात आहे. दुसरीकडे, सीएनजी (CNG) गॅस भरण्यासाठी वाहनधारकांना तब्बल ३ ते ४ तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे सुट्ट्या गावी घालवण्यासाठी आलेले चाकरमानी आणि पर्यटकांचा अमूल्य वेळ रांगेतच वाया जात आहे.

​इंधनाच्या या तीव्र टंचाईमुळे पर्यटकांच्या फिरण्यावर मोठ्या मर्यादा आल्या असून, येत्या ३ ते ४ दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची आणि पेट्रोल पंप पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोकण किंवा गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल, तर प्रवासाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

भारतीय रेल्वेत १८ व्या नवीन झोनचा समावेश; १८ स्टारच्या नवीन लोगोचे अनावरण

   Follow us on        

नवी दिल्ली:भारतीय रेल्वेच्या विस्तारामध्ये आता एका नवीन अध्यायाची भर पडली असून ‘दक्षिण किनारपट्टी रेल्वे’ (South Coast Railway – SCoR) हा देशातील १८ वा रेल्वे झोन (परिमंडळ) म्हणून अधिकृतपणे कार्यान्वित होत आहे. या नवीन झोनच्या निर्मितीमुळे भारतीय रेल्वेच्या बोधचिन्हातही (लोगो) बदल करण्यात आला असून, आता रेल्वेच्या लोगोमध्ये १८ तारे झळकणार आहेत.

​रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, राजपत्रित अधिसूचनेद्वारे (Gazette Notification) या नवीन झोनच्या कार्यान्वयनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, १ जून २०२६ पासून ‘दक्षिण किनारपट्टी रेल्वे’ पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात करेल. १८ व्या झोनचे आगमन भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक असल्याने, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CRB & CEO) यांनी या बदलाला मान्यता दिली आहे.

​या नवीन झोनच्या सन्मानार्थ, आता सर्व अधिकृत कामकाजात १८ तारे असलेला सुधारित लाल रंगाचा लोगो वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व विभागीय रेल्वे आणि सार्वजनिक उपक्रमांना १ जून २०२६ पासून या नवीन झोनचा समावेश असलेल्या लोगोचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण किनारपट्टी रेल्वेच्या निर्मितीमुळे संबंधित भागातील रेल्वे प्रशासनात अधिक सुसूत्रता येईल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोकण रेल्वेवर उन्हाळी सुट्टीत ‘सावंतवाडी-पनवेल’ साप्ताहिक स्पेशल ट्रेन धावणार

   Follow us on        

​नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने सावंतवाडी रोड ते पनवेल दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत एकूण ४ फेऱ्या पूर्ण करेल.

​गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग:

गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी रोड – पनवेल स्पेशल दर शनिवारी सकाळी ०७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:०० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०१००७ पनवेल – सावंतवाडी स्पेशल दर शनिवारी संध्याकाळी १८:१० वाजता पनवेलहून सुटेल आणि रविवारी पहाटे ०४:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. प्रवासादरम्यान ही ट्रेन कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.

ही ट्रेन १६ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत धावणार असून दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ४ फेऱ्या होतील. या गाडीला एकूण २० एलएचबी (LHB) कोच असतील, ज्यामध्ये वातानुकूलित (AC) आणि शयनयान (Sleeper) डब्यांचा समावेश आहे. ही ट्रेन पूर्णपणे विजेवर चालणारी (Electric Traction) असेल. कोकण रेल्वेने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, स्थानकांवर या संदर्भात फलक आणि उद्घोषणांद्वारे माहिती दिली जाणार आहे.

नागपूर-मडगाव एक्सप्रेसच्या नियमित सेवेचा आरंभ; नवीन क्रमांक आणि वेळापत्रक जाहीर

   Follow us on        ​

नागपूर: नागपूर आणि कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव (NGP-MAO) दरम्यान चालवली जाणारी विशेष ट्रेन आता नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या गाडीला आता नवीन क्रमांक देण्यात आला असून ती द्वि-साप्ताहिक (Bi-weekly) स्वरूपात धावणार आहे.

​नवीन गाडी क्रमांक आणि वेळापत्रक

​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जुनी विशेष ट्रेन (०११३९/०११४०) आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्सप्रेस या नवीन क्रमांकाने ओळखली जाईल.

​गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव):

​ही गाडी नागपूरवरून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता सुटेल.

​ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी १७:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी १६ मे २०२६ पासून होईल.

​गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर):

​ही गाडी मडगाववरून दर शुक्रवारी आणि सोमवारी रात्री २०:०० वाजता सुटेल.

​नागपूरला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री २१:२५ वाजता पोहोचेल.

​या गाडीची नियमित सेवा मडगाववरून १७ मे २०२६ पासून सुरू होईल.

​ही एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान खालील  स्थानकांवर थांबेल:

नागपूर जंक्शन, वर्धा जंक्शन, पुलगाव जंक्शन, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी आणि मडगाव जंक्शन.

​प्रवासाचा तपशील

​एकूण अंतर: १३४२ किलोमीटर.

​सरासरी वेग: ५० ते ५२ किमी प्रति तास.

​प्रवासाचा वेळ: साधारण २६ तास ४० मिनिटे (नागपूर-मडगाव).

​ही ट्रेन नियमित झाल्यामुळे विदर्भ आणि खानदेशातील प्रवाशांना थेट गोव्याला जाण्यासाठी कायमस्वरूपी सोय उपलब्ध झाली आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

Konkan Railway: मंगला एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

कणकवली:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम जंक्शन – ह. निजामुद्दीन ‘मंगला लक्षद्वीप’ एक्सप्रेसच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात अंशतः बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, कणकवली स्थानकावरील या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक १४ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

​कणकवली स्थानकावर ही गाडी सध्या पहाटे ०४:४२ वाजता येऊन ०४:४४ वाजता सुटते. मात्र, नवीन बदलानुसार ही गाडी आता पहाटे ०५:२० वाजता कणकवलीत पोहोचेल आणि ०५:२२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपला प्रवास सुकर करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ ॲपचा वापर करावा, असेही कळवण्यात आले आहे.

दिल्लीतील जनजातीय सांस्कृतिक संमेलनासाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

मडगाव: दिल्ली येथे दि. २४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जन जातीय सांस्कृतिक संमेलना’साठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि शकूर बस्ती (दिल्ली) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११०८ मडगाव जंक्शन – शकूर बस्ती स्पेशल ही रेल्वे शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी पहाटे ०२:३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:१५ वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११०७ शकूर बस्ती – मडगाव जंक्शन स्पेशल ही रेल्वे सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी मध्यरात्री ०१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​या विशेष ट्रेनला प्रवासादरम्यान करमळी, थिवी, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कामण रोड, वसई रोड, उधना जंक्शन, सुरत, वडोदरा जंक्शन, गोधरा जंक्शन, दाहोद, रतलाम जंक्शन, नागदा जंक्शन, कोटा जंक्शन, मथुरा जंक्शन आणि पलवल या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीची रचना एकूण २२ डब्यांची असून, त्यामध्ये १८ शयनयान (Sleeper), २ जनरल आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी: ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत मोफत बोधगया यात्रेचे आयोजन

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया (बिहार) येथे मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून, मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

​ही तीर्थयात्रा ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची सोय, राहण्याची व्यवस्था आणि भोजन असा सर्व खर्च महाराष्ट्र शासनामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही आर्थिक शुल्काशिवाय बोधगया येथील पवित्र स्थळांचे दर्शन घेता येणार आहे.

​या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही अटी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी ही उत्पन्नाची मर्यादा ठरवण्यात आली असून, अधिकृत कागदपत्रांच्या आधारे याची पडताळणी केली जाणार आहे.

​इच्छुक आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनी आपले अर्ज २० मे २०२६ पर्यंत मुंबई शहरातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या योजनेबाबत अधिक माहिती किंवा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search