दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नांत कार घुसली थेट काजू स्टॉलमध्ये.

   Follow us on        

सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील झारप ते पत्रादेवी बायपासवर असलेल्या मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी एक भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या पर्यटकांची कार एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ररस्त्याकडेला असलेल्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये शिरली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवणासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खाजगी कंपनीत कामाला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुट्टीनिमित्त गोव्याला पर्यटनासाठी आले होते. आपली सहल संपवून ते त्यांच्या होंडा अमेझ कारने (MH 23 BH 8533 A) मुंबईकडे परतत असताना, मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला. त्याला वाचवण्यासाठी कार चालकाने तातडीने ब्रेक मारला, ज्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने फिरून रस्त्याच्या कडेला असलेल्या मंगेस राऊळ यांच्या काजू स्टॉलमध्ये जोरात शिरली.

​ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी योगायोगाने स्टॉल मालक मंगेस राऊळ जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून दुकानाच्या दिशेने येत असतानाच त्यांच्या डोळ्यांदेखत हा थरार घडला. जर ते दुकानात असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, या धडकेत त्यांच्या दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातातील जखमी युवकांना तातडीने सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, वाहतूक पोलीस गुरुनाथ नाईक व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सायंकाळपर्यंत या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. महामार्गावरील अशा धोकादायक वळणांवर वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search