नांदेड:दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने नांदेड-मुंबई दरम्यान नवीन द्विसाप्ताहिक (आठवड्यातून दोनदा) रेल्वे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन आणि राज्यराणी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे प्रवाशांचे, विशेषतः स्लीपर कोचमधील प्रवाशांचे हाल होत होते. ही अडचण सोडवण्यासाठी प्रवाशांकडून सातत्याने नवीन रेल्वेची मागणी केली जात होती, ज्याला अखेर यश आले आहे.
ही नवीन गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पर्यंत धावणार असून ती आठवड्यातील सोमवार आणि बुधवार या दोन दिवशी उपलब्ध असेल. ही रेल्वे नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम आणि अकोला मार्गे मुंबईला पोहोचणार आहे. यामुळे केवळ नांदेडच नव्हे, तर हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. नोकरी, व्यवसाय आणि मंत्रालयातील कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
असे असेल रेल्वेचे वेळापत्रक:
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन गाडीचा (१७६६५/१७६६७) प्रवास असा असेल:
प्रस्थान: नांदेड येथून रात्री ९.१५ वाजता.
प्रमुख थांबे:
पूर्णा: रात्री १०.०० वा.
वसमत: रात्री ११.४२ वा.
हिंगोली: रात्री १२.५२ वा.
वाशिम: रात्री १.३५ वा.
अकोला: पहाटे ३.४५ वा.
आगमन: मुंबई (LTT) येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.०० वाजता.
नांदेड जिल्हा रेल्वे परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले असून, या नवीन गाडीमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.


