मुंबई: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीपाठोपाठ आता इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्यालाही मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यामुळे येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात आता इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी अशा चारही वर्गांचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत राहून, विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी आणि अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) लक्षात घेऊन हा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या बैठकीला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.
या नवीन आराखड्याला आता अभ्यासक्रम समन्वय समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, ‘बालभारती’मार्फत या वर्गांची पाठ्यपुस्तके तातडीने तयार केली जाणार आहेत. ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) याच महिन्यात मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले असून, त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.


