जांभवडे ग्रामपंचायतीने मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसोबतच संबंधित कुटुंबांची घरपट्टी माफ करणे आणि दरवर्षी मोफत शेती उपयोगी साहित्य पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Follow us onग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रोखलेली संख्या वाढवून बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पुनरुज्जीवित करण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने एक कौतुकास्पद आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि पालक व विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या निर्णयाची अधिकृत घोषणा सरपंच अमित मडव आणि ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांनी मिळून केली आहे. या योजनेनुसार मराठी शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रामपंचायतीतर्फे ५,००० रुपयांची रोख आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, शासकीय नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मिळणारे ६,००० रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ग्रामपंचायतीने केवळ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन न थांबता त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा दिला आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची ग्रामपंचायतीकडून आकारली जाणारी घरपट्टी पूर्णपणे माफ केली जाणार आहे. तसेच, शेतीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबांना शेतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत पुरवले जाईल.
जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी जांभवडे येथे विशेष ‘शैक्षणिक ग्रामसभा’ आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला सरपंच अमित मडव, ग्रामपंचायत सदस्य उदय मडव, शाळू कदम, बाबा परेरा, उपसरपंच श्री. पावसकर, सौ. पिंटो यांच्यासह गावातील विविध शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळ देण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या क्रांतिकारक निर्णयाचे सर्व स्तरांतून, विशेषतः पालक आणि ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.


