मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (NH66) काम पूर्ण करण्याबाबत नवीन आश्वासने दिली जात असली तरी, प्रत्यक्ष कामाची संथ गती आणि विलंबामुळे या प्रकल्पाच्या प्रगतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग एका महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, स्थानिक निरीक्षणा प्रमाणे खरी परिस्थिती गडकरींच्या दाव्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे दिसून येत आहे.
महामार्गावरील अनेक महत्त्वाचे टप्पे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि जोडणी रस्ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. अधिकृत दावे आणि प्रत्यक्ष कामातील तफावत वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. जाणकारांच्या मते, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जर पावसाळ्यामुळे कामाचा वेग मंदावला, तर ही मुदत आणखी लांबू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा प्रवासासाठी चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अनिश्चितता चिंतेचा विषय ठरत आहे.
या महामार्गाला यापूर्वीही भूसंपादन, तांत्रिक अडचणी आणि अंमलबजावणीतील दिरंगाई यामुळे अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या काही पट्टे वाहतुकीसाठी खुले असले, तरी अनेक ठिकाणी खड्डे, वळणे आणि अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता येणारे काही आठवडे हे ठरवतील की, हा बहुप्रतिक्षित महामार्ग खरोखरच पूर्ण होतो की प्रवाशांना पुन्हा एकदा विलंबाचा सामना करावा लागतो.


