सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा आज गाठला गेला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे बहुप्रतिक्षित ‘ताज हॉटेल’ (Taj Hotel) उभारण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL – ताज समूह), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधी मंडळात मंत्रालयात त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित लक्झरी पर्यटन प्रकल्पाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या या विशेष स्वाक्षरी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडी-वेंगुर्ला क्षेत्राचे आमदार दीपक केसरकर, IHCL चे व्यवस्थापकीय संचालक पुनीत छटवाल आणि MTDC चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक खातेदारांच्या हक्कांचे पूर्ण रक्षण व्हावे आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने हा त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. करारातील तरतुदींनुसार या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या सुमारे १८५ स्थानिक खातेदारांना तीन टप्प्यांत एकूण ६० कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे.
ताज समुहाच्या या जागतिक दर्जाच्या लक्झरी रिसॉर्टमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील, तसेच कोकणातील स्थानिक व्यवसाय, वाहतूक आणि आदरातिथ्य क्षेत्राला मोठी आर्थिक चालना मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकल्पातील सर्व कायदेशीर व प्रशासकीय अडथळे दूर करून तो मार्गी लावल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.


