मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सूचनेनंतर, एसटीने गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या बसच्या ग्रुप बुकिंगवर आकारण्यात येणारे ३० टक्के जादा शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. शुक्रवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली, ज्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
साधारणपणे गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी कोकणात जाण्यासाठी सुमारे ५ हजार एसटी बसेस आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना त्यांच्या गावी सोडल्यानंतर, या बसेस बहुधा रिकाम्या परत आणाव्या लागतात. रिकाम्या बसेस परत आणताना एसटी महामंडळाला इंधनाचा मोठा खर्च तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागतो. या परिस्थितीचा विचार करता, एसटीचा खर्च वाढल्यामुळेच पूर्वी ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिले.
या वाढीव शुल्कामुळे प्रवाशांवर आर्थिक बोजा पडत होता. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त कामाच्या भत्त्यांमुळे एसटीच्या खर्चात झालेली वाढ ही या शुल्कामागील प्रमुख कारणे होती. या पार्श्वभूमीवर, अनेक कोकणवासीय आणि विविध गणेशोत्सव मंडळांनी एसटी महामंडळाकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती.
जनतेच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला हे जादा शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत एसटी प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे आता कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा होणार आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, यापुढे यंदाच्या गणेशोत्सवासाठी करण्यात येणाऱ्या एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंगवर) कोणतेही ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. सरकार आणि एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत होत असून, यामुळे गणेश भक्तांचा कोकण प्रवासाचा खर्च कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.


