मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल २०२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या एका महिन्यात रेल्वेने तब्बल २.२४ लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून १६ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दंड वसुलीत १७० टक्क्यांची अवाढव्य वाढ झाली असून, रेल्वे प्रशासनासाठी हा एक मोठा टप्पा (माईलस्टोन) मानला जात आहे.
मागील वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, एप्रिल २०२५ मध्ये १.४२ लाख प्रवाशांकडून ५.९२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. मात्र, यंदा मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि कठोर नियोजनामुळे ही वसुली १६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या रेल्वे जाळ्यामध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेली ही मोहीम यशस्वी ठरली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना या कारवाईमुळे मोठा दणका बसला आहे. रेल्वे प्रशासनाने या यशाचे श्रेय आपल्या तिकीट तपासणी पथकाच्या अथक परिश्रमाला दिले आहे.


