जबलपूर:निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. ३० एप्रिल रोजी जबलपूरच्या बर्गी धरणात एमपी टुरिझमची क्रूझ बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत ९ निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. मात्र, या दुर्घटनेच्या १५ तासांनंतर समोर आलेल्या एका छायाचित्राने संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठीत घट्ट धरून ठेवल्याचे पाहायला मिळाले.
नर्मदा नदीच्या संथ पात्रात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने पर्यटकांच्या आनंदाचे रूपांतर किंकाळ्यांमध्ये केले. सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट खमरिया बेटाजवळ वादळात सापडली आणि पाहता पाहता उलटली. बचाव पथकाने १५ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तर ९ जणांचे मृतदेह हाती लागले. अद्यापही काही जण बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.
मरणानेही ज्यांना वेगळे केले नाही…
बचाव कार्यादरम्यान समोर आलेल्या एका दृश्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले. पाण्यात तरंगणाऱ्या एका माऊलीने आपल्या लहान मुलाला छातीशी इतके घट्ट धरून ठेवले होते की, मृत्यूनेही त्यांची ती मिठी सोडवली नव्हती. दोघांनीही लाईफ जॅकेट घातले होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. “आई” काय असते, हे त्या फोटोने पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला वाचवण्याचा त्या माऊलीचा प्रयत्न आणि ती मायेची ओढ पाहून संपूर्ण सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवले असले तरी, या घटनेने पर्यटनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे मानवी प्रयत्न तोकडे पडले, पण त्या आई-मुलाच्या अमर प्रेमाची कहाणी आता प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, बेपत्ता व्यक्ती सुखरूप मिळाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.


