कणकवली:मुंबई-गोवा महामार्गावरील कासरडे ठिठा येथे शनिवारी (९ मे २०२६) उड्डाणपुलाच्या मधल्या भागातील काँक्रीट स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे पुलाच्या बांधकामातील लोखंडी सळ्या (रॉड) उघड्या पडल्या असून, पुलाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही याच पुलाचा स्लॅब दोनदा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार प्रमोद जठार यांनी तत्काळ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच अशा प्रकारे उड्डाणपूल कमकुवत ठरत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागाची तातडीने दुरुस्ती करावी आणि वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे.


