आता शाळांत घुमणार ‘मालवणी’; बालभारतीचे कौतुकास्पद पाऊल

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

महाराष्ट्रातील मातीची अस्मिता आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असणाऱ्या प्रांतिक बोलीभाषांना शिक्षण क्षेत्रात मानाचे स्थान देण्याचा यशस्वी पायंडा ‘बालभारती’ने चालू ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या शैक्षणिक वर्षाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यातील समृद्ध बोलीभाषांचा समावेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता सहावीच्या नव्या पुस्तकात कोकणची शान असणारी ‘मालवणी’ आणि विदर्भाचे वैभव असणारी ‘वऱ्हाडी’ या बोलीभाषांना स्थान देण्यात आले असून, आगामी काळात याचा विस्तार उच्च माध्यमिक (११ वी व १२ वी) स्तरावरही करण्याचा महत्त्वपूर्ण विचार बालभारती करत आहे.

​राज्यात येत्या १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होत आहे. या नव्या वर्षात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमावर आधारित आकर्षक पाठ्यपुस्तके लागू केली जाणार आहेत. या नव्या पुस्तकांमध्ये ज्ञानरंजनासोबतच स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘मालवणी’ आणि ‘वऱ्हाडी’ या बोलीभाषांचा मनमोहक सुगंध दरवळणार आहे. विद्यार्थ्यांची बोलीभाषेशी नाळ जोडली जावी, म्हणून या पुस्तकात या भाषांमधील एक विशेष उतारा (पाठ) समाविष्ट करण्यात आला आहे. यासोबतच, त्या बोलीभाषेतील साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांचा परिचयही विद्यार्थ्यांना करून दिला जाणार आहे.

​बालभारतीच्या नियोजनानुसार, पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच इयत्तांच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने विविध बोलीभाषांचा समावेश केला जाईल. इतकेच नव्हे, तर अकरावी आणि बारावीच्या स्तरावरही या बोलीभाषांचा विस्तार करण्याचे नियोजन सुरू आहे. बालभारतीच्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या मातृबोलीचा सार्थ अभिमान वाटेल, तसेच भाषेतील वैविध्य समजून घेण्यास मदत होईल. ग्रामीण आणि शहरी भागातील दरी मिटवून शिक्षणात अधिक आपुलकी निर्माण करण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.

​”जुन्या अभ्यासक्रमातही पहिली ते दहावीच्या पुस्तकांत बोलीभाषांमधील कविता व पाठांचा समावेश होता. या प्रयोगाला शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून अत्यंत सकारात्मक आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. याच यशामुळे नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्येही बोलीभाषांचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”

— सविता वायळ (विशेषाधिकारी, मराठी विषय, बालभारती)

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search