मालवण: मानवता विकास परिषद व रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष श्री. राजन गिरप यांच्यासह उद्योजक उमेश बिरमोळे, मोहन वराडकर, सागर हडकर, परशुराम पाटकर आणि सामाजिक क्षेत्रातील विलास मेस्त्री, यतीन खोत यांसारख्या मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटींमध्ये ‘मसुरे सर्वांगीण विकास परिषद’ स्थापनेबाबत आणि स्थानिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या दौऱ्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देताना श्रीकांत सावंत यांनी स्पष्ट केले की, कोकणच्या प्रत्येक गावाचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील कार्यांचे नियोजन जर एकात्म आणि सहकार्यपूर्ण पद्धतीने झाले, तर कोकणच्या विकासाची घोडदौड कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, येत्या १४ मे २०२६ रोजी मालवणच्या लीलांजली सभागृहात आयोजित ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा ‘विशेष दिशादर्शक’ ठरणार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.


