मुंबई:
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षां पासुन पायाभूत कामांमुळे प्रभावित झालेली कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणारी लोकप्रिय सह्याद्री एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक ११०२३/११०२४) लवकरच पूर्णपणे आणि नियमित स्वरूपात सुरू होणार आहे. मुंबईतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे आणि बांधकामाचे काम पूर्ण होताच ही गाडी म्हणजे मुंबई पर्यंत पूर्ववत धावू लागेल, अशी महत्त्वाची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी आज दिली.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई या मार्गावर धावणारी साह्याद्री एक्सप्रेस ही या भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि उपचारासाठी मुंबईला येणारे रुग्ण यांच्यासाठी ही दैनिक एक्सप्रेस अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, मुंबईतील स्थानकांचा पुनर्विकास आणि प्लॅटफॉर्म विस्ताराच्या मोठ्या कामांमुळे या गाडीच्या संचलनावर तात्पुरता परिणाम झाला होता, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
पायाभूत कामांमुळे प्रवासावर झाला होता परिणाम
या संदर्भात सविस्तर माहिती देताना महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील वाढती गर्दी आणि भविष्यातील रेल्वे विस्तार लक्षात घेता स्थानकांचा विकास करणे अत्यंत आवश्यक होते. या तांत्रिक आणि पायाभूत कामांमुळे साह्याद्री एक्सप्रेसचे संचलन काही काळासाठी प्रभावित झाले होते. परंतु, रेल्वे प्रशासन हे काम अत्यंत वेगाने आणि युद्धपातळीवर पूर्ण करत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, मुंबईतील प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात असून ते संपताच ही गाडी तात्काळ पूर्ववत सुरू केली जाईल. प्रवाशांना लवकरात लवकर ही महत्त्वाची रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचेही श्रीवास्तव यांनी आवर्जून सांगितले.
या घोषणेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये आणि विविध प्रवासी संघटनांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नियमित सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, यात शंका नाही.


