मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींनी जाहीर केली नवीन डेडलाईन!

   Follow us on        

नवी दिल्ली:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम येत्या २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना विविध समस्यांबाबत एक सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत गडकरी यांनी महामार्गाचे उर्वरित रखडलेले काम २० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

​महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे होणारी तीव्र वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणींकडे हुसेन दलवाई यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०११ पासून म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून रखडत सुरू आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक बड्या कंत्राटदार कंपन्या बदलण्यात आल्या, परंतु महामार्गाची स्थिती सुधारू शकलेली नाही. सद्यस्थितीचा विचार केला तर, एकट्या रायगड जिल्ह्यातील १४० किलोमीटरच्या टप्प्यांपैकी केवळ ७० टक्के काम पूर्ण होऊ शकले असून, तब्बल ३० टक्के काम अजूनही प्रलंबित आहे.

​काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू; कोकणवासियांमध्ये संताप

​एकीकडे महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) खारपाडा येथे पहिला टोल नाका (Toll Plaza) सुरू करून टोल वसुली सुरू केली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या टोल वसुलीला ‘प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली लूट’ म्हणून संबोधले आहे. “जेव्हा रस्ताच पूर्णपणे सुरक्षित आणि तयार नाही, तर मग टोल कोणत्या गोष्टीचा वसूल केला जात आहे?” असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत. स्थानिक स्तरावर या टोल नाक्याला तीव्र विरोध होत असूनही प्रशासनाने टोल वसुली थांबवलेली नाही.

​आता जून महिना सुरू झाला असून मान्सून अगदी तोंडावर आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि स्थानिक रहिवाशांना पुन्हा एकदा खड्डेमय व धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार की काय, अशी भीती सतावत आहे. “दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते, पण प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही सुधारणा दिसत नाही,” असा आरोप आता कोकणवासियांकडून केला जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search