रत्नागिरी: भारतीय रेल्वेच्या ढसाळ नियोजनाचा एक संतापजनक प्रकार रत्नागिरी रेल्वे स्थानकावर समोर आला आहे. पाटणा एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्यांत विना तिकीट प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे अधिकृत प्रवाशांना साधे डब्यात पाय ठेवणेही कठीण झाले आहे. कन्फर्म तिकीट खिशात असूनही अनेक प्रवाशांना रेल्वे गाडी सोडून द्यावी लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानकावर आलेल्या या गाडीतील आरक्षित डब्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. डब्याचे दरवाजे आणि अगदी स्वच्छतागृहांच्या बाहेरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकिटे होती, त्यांना आपल्या सामानासह आत शिरणे अशक्य झाले होते. एका संतप्त प्रवाशाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, “सर्व परप्रांतीय प्रवासी बेकायदेशीरपणे आरक्षित डब्यातून प्रवास करत आहेत. आमच्याकडे रिझर्व्हेशन आहे, पण आत जायला जागाच नाही. मग आम्ही प्रवास करायचा कसा? ”
यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) जवान आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी डब्यात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही प्रवाशांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी इतकी अफाट होती की खुद्द पोलीसही तिथे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. आरक्षित डब्यात विना तिकीट प्रवासी कसे घुसले आणि टीसी (TC) यावर काय कारवाई करत आहेत, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी ही प्रचंड गर्दी आणि रेल्वे प्रशासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram


